केंद्रात आणि देशातील इतर काही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात विरोधी पक्षांची राष्ट्रीय आघाडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यामध्ये एकीकडे केसीआर प्रयत्न करत असून दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही तशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विरोधकांची आघाडी काँग्रेसला बाहेर ठेवून होऊ शकत नाही, हे शिवसेनेनं अनेकदा स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं देशातील समस्त विरोधी पक्षांचे कान टोचले आहेत. तसेच, मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस उरल्याचा भाजपा कार्यकर्त्यांना दिलेला इशारा विरोधी पक्षांसाठीही आहे, असंही म्हटलं आहे.
‘विरोधकांची १० डोकी व १० तोंडांनी…’
‘देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय, असा प्रश्न आता पडला आहे. या सगळ्यांना भाजपपेक्षाही काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू वाटतो व हा विचार विरोधकांच्या कोणत्याही आघाडीस मजबुती देणारा नाही. अखिलेश, केजरीवाल, विजयन, नितीशकुमार यांना कुणाशी लढायचे आहे? काँग्रेसला दुबळे करून हे लोक भाजपशी कसे लढणार? विषय फक्त निवडणुकांचा नाही, तर देशात फोफावलेल्या हुकूमशाही प्रवृत्तीचा आहे. न्यायव्यवस्थेपासून देशातील सर्वच प्रमुख स्तंभांवर हल्ले सुरू आहेत. संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? त्यांचे पाय दोन. त्यामुळे रस्ता एकच, पण दहा डोकी व दहा तोंडांनी बोलणे विचार करणे सुरू आहे’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
‘भारत जोडो’मुळे विरोधकांना दचकायला काय झालं?’
‘भारतीय जनता पक्ष राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने डचमळला आहे. यात्रा विस्कळीत व्हावी म्हणून कोरोनाचे भय घातले, पण विरोधी पक्षाला दचकायला काय झाले? समस्त विरोधी पक्ष एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होईल. प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे, पण लोकनायक जयप्रकाश नारायण होणे आता सोपे नाही. डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर २०२४ ला नक्कीच बदल होईल. नाही तर शंभर आचारी रस्सा भिकारी असेच घडेल!’ अशा शब्दांत विरोधकांनी एकजूट दाखवण्याचा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
एकनाथ शिंदेंनी दिले मुंबई मनपासाठी नव्या युतीचे संकेत; म्हणाले, “डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये…”
‘काँग्रेस १०० पार झाली की दिल्लीचा डोलारा…’
‘काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा ‘शंभर’ पार करणे गरजेचे आहे व आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल. याचे भान राष्ट्रीय राजकारणात उडी मारणाऱ्या प्रत्येकाने ठेवायला हवे. काँगेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करता येणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावा भरवून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करीत आहेत, ते एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा २०२४ चा मार्ग मोकळा करीत आहेत’, अशी भीतीही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
