एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षांने लांबणीवर टाकला आहे. १ ऑक्टोबर २०२३पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

गडकरी यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली. ‘वाहन उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीबाबत भेडसावणाऱ्या समस्या त्याचा अर्थकारणावर होणारा परिणाम विचारात घेऊन प्रवासी कारमध्ये (एम-१ श्रेणी) सहा एअरबॅग सक्तीची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२३पासून होईल. सर्व प्रवाशांची सुरक्षा ही गाडीची किंमत आणि अन्य बाबींपेक्षा अधिक महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले. ६ एअरबॅग दिल्यामुळे गाडीची किंमत वाढेल, असा दावा वाहन उत्पादकांनी केला आहे. मात्र या सक्तीवर गडकरी ठाम आहेत.