Sonam Raghuvanshi : मधुचंद्राला जाऊन बेपत्ता झालेलं जोडपं म्हणजे सोनम आणि राजा रघुवंशी. मे महिन्यात हे जोडपं बेपत्ता झालं. मात्र २ जून रोजी राजाचा मृतदेह मिळाला. त्याचा अपघाती मृत्यू नसून हत्या झाल्याची बाबही समोर आली. मर्डर वेपनही पोलिसांना मिळालं. आता आज त्याची पत्नी सोनमनेच त्याची हत्या घडवून आणल्याची बातमी समोर आली. सोनमला अटकही करण्यात आली. सोनम रघुवंशी कोण आहे? तिने पतीची म्हणजेच राजा रघुवंशीची हत्या घडवून आणली असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे.
कोण आहे सोनम रघुवंशी?
सोनम रघुवंशी ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिचा नवरा राजा रघुवंशीही याच शहरात राहात होता. राजा आणि तिचं लग्न झाल्यानंतर हे दोघंही २० मे रोजी मधुचंद्रासाठी गेले होते. सुरुवातीला ते दोघंही बंगळुरुला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले. तिथे या दोघांनीही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यानंतर दोघंही शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला २३ मे रोजी गेल्यापासून या दोघांचाही संपर्क होत नव्हता. मेघालयातील पर्वतरांगांमधून हे दोघंही बेपत्ता झाले होते. सोनम ही नंदगंज या ठिकाणी सापडली. वाराणसीपासून ४० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. गाझिपूर पोलिसांना तिच्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांना ही माहिती दिली. ज्यानंतर सोनम रघुवंशीला काशी येथील ढाब्यावरुन अटक करण्यात आली. तिला आधी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर तिच्या अटकेची प्रक्रिया करण्यात आली.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
पोलीस अधीक्षक डॉ. नीरज राजा यांनी सांगितलं सकाळी गाझिपूर पोलिसांनी आम्हाला सोनमबाबत माहिती दिली. सोनम रघुवंशी नावाच्या महिलेबाबत त्यांनी सांगितलं. आम्ही तातडीने कारवाई केली आणि तिला अटक केली. आम्ही सातत्याने मेघालय पोलिसांच्या आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या संपर्कात होतो असं उत्तर प्रदेश पोलिसांनीही सांगितलं.
सोनम रघुवंशी कशी पकडली गेली?
रात्रीचा १ वाजला होता, सोनम आमच्या ढाब्यावर आली होती. तिने सांगितलं भय्या मला घरी फोन करायचा आहे. ती रडत होती. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला. सोनम आणि राजा रघुवंशीची बातमी आम्हाला माहीत होती त्यामुळे आम्ही पोलिसांना सांगितलं. सोनमने माझ्या फोनवरुनच तिच्या कुटुंबाला फोन केला असं साहिल यादव नावाच्या ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितलं. ANI ला साहिलने माहिती दिली सोनम ढाब्याच्या एका बाजूला बसली होती. त्यावेळी तिच्या भावाचाही फोन मला आला. त्यानंतर पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस आले आणि सोनमला घेऊन गेले.
सोनमच्या सासूने काय म्हटलं आहे?
सोनमची सासू आणि राजा रघुवंशीची आई उमा यांनी म्हटलं आहे की सोनम लग्न ठरल्यानंतर आमच्याकडे येत होती. ती माझ्याशी खूप चांगलं वागायची. सोनम जर या सगळ्यात असेल आणि तिच्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला असेल तर सोनमला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ते तिघेजण कोण होते त्यांचाही शोध लागला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. मात्र सोनम जर निष्पाप असेल तर तिला पोलिसांनी तुरुंगात डांबता कामा नये. सोनमची वागणूक खूप चांगली होती.
सोनमने अफेअर असल्याने पतीची हत्या केली असा मेघालय पोलिसांचा दावा
मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजाच्या हत्या प्रकरणात सोनमच सामील आहे. सोनमचं अफेअर सुरु होतं त्यामुळेच लग्नानंतर तिने पती राजाची हत्या घडवून आणली. राज कुशवाह या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात सोनम जेव्हा सत्य सांगेल तेव्हाच काय ते समोर येईल असं राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने म्हटलं आहे.