भारतीय जनता पार्टीने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारपासून (११ ऑक्टोबर) आता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना भाजपा मुख्यालयात थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे. येत्या सोमवारपासून पक्षाच्या मुख्यालयात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. करोना महामारीमुळे काही काळ हा विभाग कार्यरत नव्हता. सोमवारपासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजपा मुख्यालयात उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपा सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव यांच्यापासून होणार असून पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकामध्ये या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. काय आहे सहकार विभाग? ऑगस्ट २०१४ मध्ये भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात सहकार विभाग सुरू झाला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी त्यावेळी केंद्रीय मंत्री म्हणून या विभागाअंतर्गत सहयोग कक्षाचं उद्घाटन केलं होतं. सहयोग हा भाजपाच्या केंद्रीय संघटनेच्या १९ विभागांपैकी एक आहे. हा सहकार विभागाचाच एक भाग आहे. यात दररोज एका केंद्रीय मंत्र्याने पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सहकार कक्षात कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना दोन तास भेटून संवाद साधणं. तसेच त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याच्या दिशेने पावलं उचलणं अपेक्षित आहे. हा उपक्रम म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि सर्वसामान्य लोक, कार्यकर्त्यांमधील संवादाचं मुख्य माध्यम मानलं जातं.