पीटीआय, तेल अविव इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीतून निदान तात्पुरत्या काळासाठी, हजारो सैनिक माघारी बोलावत असल्याचे सोमवारी जाहीर केले. हमासच्या इस्रायलवरील ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धानंतर, कोणत्याही प्रकारच्या माघारीसंदर्भात इस्रायलकडून करण्यात आलेली ही सर्वात महत्त्वाची सार्वजनिक घोषणा आहे. हे युद्ध गेल्या १२ आठवडय़ांपेक्षा जास्त काळ सुरू असून ते संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तसेच त्याचा इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला जात असल्याचे कारण इस्रायलच्या लष्कराकडून देण्यात आले. मात्र, याचा अर्थ आम्ही कोणतीही तडजोड करत आहोत असा होत नाही असेही लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हागेरी यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले. तसेच युद्धाची तीव्रता कमी करण्याच्या अमेरिकेच्या आवाहनाचाही त्यांनी उल्लेख केला नाही. हेही वाचा >>>जपानमध्ये किनारपट्टीच्या भागात डझनभरहून अधिक भूकंपाचे धक्के, घरांचं नुकसान, रस्त्यांना भेगा अन्… विशेष म्हणजे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी शनिवारीच आणखी काही महिने तरी युद्ध संपुष्टात येणार नाही असे सांगितले होते. त्याशिवाय गेल्या आठवडय़ात अमेरिकने इस्रायलला शस्त्रविक्रीचा प्रस्ताव मंजूर केला होता. दुसरीकडे त्यामुळे इजिप्त, कतार आणि युरोपमधील देशांच्या पुढाकाराने युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच युद्धग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून सातत्याने तात्पुरत्या शस्त्रविरामाचे आवाहन केले जात होते. युद्धामध्ये बळी पडलेल्या गाझामधील सामान्य पॅलेस्टिनींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलवरील दबाव वाढत होता. या युद्धात आतापर्यंत २१ हजार ९७८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. त्यामध्ये जवळपास दोन-तृतियांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. अन्न, इंधन आणि औषधांचा पुरवठा बंद झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल वाढले आहेत. तसेच गाझा पट्टीतील २३ लाख लोकसंख्येपैकी जवळपास सर्वानाच स्थलांतर करावे लागले आहे.