केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपक्षाही जास्त दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या(शनिवार , ६ फेब्रवारी) देशभरात चक्का जाम आंदोलन केल जाणार आहे. मात्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज सांगतिलं आहे.

ही माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, ”जी लोकं इथं येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील, हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही.”

तसेच, ”उद्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. दिल्ली सोडून देशाच्या अन्य भागातील रस्ते बंद केले जातील. याचे कारण म्हणजे त्यांना कधीही दिल्लीला बोलावलं जाऊ शकत, त्यामुळे त्यांना स्टॅण्डबाय ठेवलं आहे.” असं देखील टिकैत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी नेत्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, यावेळीचा चक्का जाम केवळ तीन तास(दुपारी १२ ते ३ ) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल.

तर , या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, चक्का जामबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामधील पोलीस याबाबत अधिक गंभीर आहेत.