“नरेंद्र मोदींबरोबर अनेक मुद्दांवर माझे मतभेद आहेत. पण आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही. देशाला एकत्र करुन करोना व्हायरसविरोधात लढण्याची वेळ आहे. आपण एकत्र राहिलो तर करोना व्हायरसला पराभूत करु शकतो. आपण एकत्र राहून या संकटावर मात केली तर खूप पुढे निघून जाऊ” असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांकडून काय चूका झाल्या असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला त्यावर त्यांनी करोना व्हायरसला पराभूत करु त्या दिवशी मी तुम्हाला मोदींच्या चूका सांगेन असे उत्तर दिले. “करोना विरुद्ध आता लढाई सुरु झाली आहे. आताच विजय मिळवला हे जाहीर करणं चुकीचं ठरेल. आपल्याला दीर्घकाळ लढाई लढावी लागणार आहे” असे राहुल गांधी म्हणाले.

आणखी वाचा- Coronavirus : करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन पुरेसं नाही – राहुल गांधी

“लोक घरामध्ये बंद आहेत. बेरोजगारीचे संकट आहे. पण तुम्ही चिंता करु नका, भारत कुठल्याही आजारापेक्षा मोठा देश आहे. भारत या व्हायरसला पराभूत करु शकतो. पण आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. आपण एकत्र झालो तर व्हायरसला हरवू शकतो. आपण यावर मात केली तर आपण खूप पुढे निघून जाऊ. आपण यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे. विरोधी पक्षात असलो तरी माझा सरकारला पाठिंबा आहे. आम्ही सरकारला सकारात्मक सल्ले देणार” असे राहुल गांधी यांनी सांगितले.