गेल्या दोन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी भोपाळमधील आपल्या बंगल्यात वयस्कर वडिलांवर उपचार सुरु असल्याचा दावा करत आहे. आपले वडील उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं अधिकारी सांगत आहे. मात्र आई, बहिण-भाऊ आणि उपचार करणाऱ्या वैद्याला सोडून कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी देत नाही आहे. त्यांच्यावर आयुर्वैदिक पद्धतीने उपचार सुरु असल्याचा अधिकाऱ्याचा दावा आहे.

मात्र यामधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अधिकारी राजेंद्र मिश्रा यांच्या ८४ वर्षीय वडिलांना दोन महिन्यांपुर्वीच १४ जानेवारी रोजी एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केल आहे. इतकंच नाही तर त्याच दिवशी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्रही सोपवण्यात आलं होतं.

अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र मिश्रा यांच्या वडिलांचा फुफ्फुसाच्या विकारामुळे महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. पण राजेंद्र मिश्रा आपल्या वडिलांचा मृत्यू झाला हे मानण्यास तयार नाहीत. राज्य मानवाधिकार आयोगाने त्यांच्या घऱी डॉक्टरांची टीम पाठवण्याचा प्रयत्न केला असता राजेंद्र मिश्रा यांनी त्यांना परतवून लावलं होतं. 1987 बॅचचे राजेंद्र मिश्रा वरिष्ठ अधिकारी असल्याने सरकार आणि पोलीसदेखील सुरक्षित पाऊलं उचलत आहे.

‘विज्ञानाच्या पलीकडे जाऊनही अनेक गोष्टी आहेत. माझे वडील जिवंत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सहा दशकांहून जास्त काळ त्यांनी योग केला आहे. ते सध्या योगनिद्रेत आहेत. जर डॉक्टरांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला आणि काही चुकीचं झालं तर ? मग त्याला हत्या म्हणणार नाही का ?’, अशी विचारणा राजेश मिश्रा यांनी केली आहे.

‘जर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता तर मग मृतदेह आतापर्यंत कुजला नसता का ? तुम्ही मृतदेहावर उपचार करु शकत नाही. तुम्ही मृत उंदीर आणि पालीसोबतही एका तासाहून जास्त वेळ राहू शकत नाही…मला एक कळत नाही बाहेरील लोक माझ्या खासगी गोष्टींमध्ये दखल देण्याचा प्रयत्न का करत आहेत. माझ्या वडिलांवर उपचार करणे मुलभूत अधिकार आहे. मी कोणताही गुन्हा किंवा घोटाळा केलेला नाही’, असं राजेश मिश्रा यांनी सांगितलं आहे.