उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये केशकर्तनालय चालवणाऱ्या एका व्यक्तीने दोन मुलांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याकाळी मंडई चौकीपासून काही अंतरावर ही घटना घडली. मुलांच्या हत्येनंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
एनडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळी बदायूतील मंडई चौकीपासून काही अंतरावर असलेल्या बाबा कॉलनीत एका घराच्या छतावर तीन लहान मुले खेळत होती. यावेळी आरोपीने घरात घुसून या मुलांवर हल्ला केला. यावेळी आरोपीने आयूष (१२) आणि त्याचा लहान भाऊ आहान उर्फ हनी (८) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. तसेच त्यांच्याबरोबर खेळ असलेला आणखी मुलगा पियूषवरही (७) त्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद (२५ )असं या आरोपीचं नाव आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती :
या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपीचा मृत्यू :
बदायूचे पोलीस अधिक्षक आलोक प्रियदर्शनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी साजिदने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पोहोचत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यात आरोपीचा मृत्यू झाला. दरम्यान, या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.