जपानमध्ये ११ मार्च २०११ रोजी आलेल्या महाभयंकर सुनामीच्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भूकंपानंतर आलेल्या या सुनामीच्या या घटनेत एकोणीस हजार लोक मरण पावले होते. सम्राट अकिहिटो व सम्राज्ञी मिशिको यांच्या उपस्थितीत सरकारने राष्ट्रीय दुखवटा कार्यक्रम टोकियो येथे झाला. सरकारी आकडेवारीनुसार या घटनेत १५८८१ लोक मरण पावले तर २६६८ जण बेपत्ता झाले होते. दुपारी पावणेतीन वाजेच्या  सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला होता, त्यामुळे या वेळी संपूर्ण देशात स्तब्धता पाळण्यात आली. हा भूकंप ९ रिश्टरचा होता. ईशान्य पॅसिफिक सागरात या भूकंपामुळे सुनामीला सुरूवात झाली. त्यामुळे जपानच्या किनारी प्रदेशांना मोठा तडाखा बसला, तर फुकुशिमा दाईची अणुप्रकल्पालाही फटका बसला. त्यामुळे अणुभट्टी वितळली व स्फोटही झाले होते. चेर्नोबिलच्या १९८६ मधील अणुदुर्घटनेनंतर ही सर्वात भयानक अणुदुर्घटना होती. सुनामीचा फटका बसलेल्या भागाचे पुनर्वसन करण्याचा वेग फारच कमी आहे. अजून ३१५,१९६ लोक बेघर आहेत; ते तात्पुरत्या निवाऱ्यात राहात आहेत. सुनामीग्रस्तांना वडिलोपार्जित जमिनींवर घरे बांधून हवी आहेत. भूकंप व सुनामीनंतर तणावामुळे वाचलेल्यांपैकी २३०३ जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांमध्ये घरेलू हिंसाचार व नैराश्य वाढले आहे. मुख्य भूकंपानंतर १० हजार छोटे धक्के बसले, त्यातील ७३६ धक्के हे ५ रिश्टरचे होते. फुकुशिमा या अणुप्रकल्पाच्या ठिकाणीही जबर धक्के बसले. तेथील अर्थव्यवस्थाच कोसळल्याने लोक फुकुशिमातून बाहेर पडत आहेत. फुकुशिमातून त्यावेळी किरणोत्सर्ग झाला होता व आता तो थांबला आहे. तेथे कुणी शेती करायला तयार नाही कारण किरणोत्सारी द्रव्यांचा अंश पिकांमध्ये येण्याची भीती त्यांना वाटते. तशा काही घटना घडल्याही आहेत. फुकुशिमात जे काही करता येणे शक्य आहे ते आम्ही करू, पण जपानमधील इतरत्र राहणाऱ्या लोकांनी किरणोत्सर्गाबाबत माहिती ठेवणे जरूरी आहे, असे फुकुशिमाचे गव्हर्नर युहेइ सातो यांनी एनएचके वाहिनीच्या खास कार्यक्रमात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two years complete for tsunami in japan
First published on: 12-03-2013 at 03:53 IST