बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. नितीश कुमार आपल्या सत्ताधारी जदयू पक्षासह भाजपासोबत गेले आणि पुन्हा सत्ताधारी झाले. हे सगळं अवघ्या १० ते १२ तासांच्या अंतरात झालं. त्यामुळे देशभर बिहारमधील घडामोडींची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत नितीश कुमार यांच्या या भूमिकांमुळे बिहारच्या राजकारणात अनेकदा असे भूकंप येऊन गेले. त्यामुळे एकीकडे नितीश कुमार यांची नेमकी भूमिका काय? यावर विश्लेषकांमध्ये खल चालू असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून नितीश कुमारांना खोचक शब्दांत लक्ष्य करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीची सुरुवातच नितीश कुमार यांनी केली होती, असं सांगताना ते इंडिया आघाडीचं पुढे जाऊन नेतृत्व करतील असं वाटत होतं, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, या वयात भाजपासोबत जाणं हा नितीश कुमार यांचा राजकीय अंत आहे, असं मोठं विधानही अग्रलेखातून करण्यात आलं आहे. "भाजपावाले सगळ्यात मोठे खरेदीदार" "लालू यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणे हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे. नीतिमत्ता व सिद्धांताच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेची ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा? भाजपवाले म्हणजे बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार व ठेकेदार बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी पन्नास-पन्नास खोक्यांना विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लावलाय ते देशाच्या जनतेला समजायला हवे", अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. “वीर सावरकर पळपुटे, आम्ही..”, खासदार इम्तियाज जलील यांची टीका, नव्या वादाची चिन्हं "जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकूमशाहीविरोधी आंदोलनातून सुरू झालेला नितीश कुमारांचा प्रवास मोदी-शहांच्या हुकूमशाहीपुढे लोटांगण घातल्याने मसणातच संपला आहे व त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीस श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे जायला हवे", असंही अग्रलेखात म्हटलं आहे. "प्रभू श्रीराम व ईव्हीएमदेखील…" "भाजप व संघ परिवाराशी अखेरपर्यंत लढण्याचा नितीश कुमार यांचा निर्धार होता. पण त्या निर्धाराचे धोतर आता सुटले असून नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे. भारतीय जनता पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटते. प्रभू श्रीराम व ‘ईव्हीएम’देखील पराभवापासून वाचवणार नाही याची त्यांना खात्री पटली आहे. ‘अब की बार चारसौ पार’ हा मोदी-शहांचा नारा म्हणजे उसने अवसान आहे. आपल्या कामांवर व नेतृत्व क्षमतेवर इतका विश्वास असता तर फोडाफोडीचे हे असे खेळ करून सत्तेसाठी हपापलेपण दाखविण्याची त्यांना काहीच गरज नव्हती", असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.