Jal Shakti minister Cr Paatil: पहलगाम हल्ल्यानंतर संबंध देशातून याचा कठोर शब्दात निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याला जबाबदार असणारे अतिरेकी आणि त्यांचा पाठिराखा पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे. केंद्रीय जल शक्ती मंत्री सीआर पाटील यांची याबाबत एक महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. सूरतमधील एका वाणिज्य कार्यक्रमात ते सहभागी झाली होते. या कार्यक्रमात त्यांनी स्वागत सोहळ्यास नकार देत, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. आपल्या भाषणात याचे स्पष्टीकरण देताना सीआर पाटील म्हणाले की, जोपर्यंत पहलगाम हल्ल्याचा सूड घेतला जात नाही. तोपर्यंत ते कोणत्याही कार्यक्रमात स्वागत स्वीकारणार नाहीत.

सूरत येथे आयोजित केलेल्या ग्लोबल इनव्हेस्टर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सीआर पाटील आले होते. यावेळी त्यांनी स्वागत स्वीकारण्यास नकार दिला. आयोजकांनी त्यांचा निर्णय उपस्थितांना सांगितला. पहलगाम हल्ल्याचा सूड घेतला जात नाही तोपर्यंत सीआर पाटील स्वागत स्वीकारणार नाहीत, असे आयोजकांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

नंतर सीआर पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, सूड घेतला जात नाही तोपर्यंत स्वागत समारंभ वैगरे काही स्वीकारणार नाही. पाकिस्तानविरोधात कारवाईचा भाग म्हणून भारताने सिंधू जल करारास स्थगिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहू देणार नाही, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील म्हणाले.

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगामजवळील बैसरन कुरणात २६ जणांची गोळ्या घालून हत्या केली. यातील २५ जण पर्यटक होते, तर एका स्थानिकाचाही मृतांमध्ये समावेश होता. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्यासाठी अनेक निर्मय घेतले आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या व्यापाराला स्थगिती देण्यात आली आहे. अटारी सीमेवरील चौकी बंद करण्यात आली आहे. भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना पुन्हा पाकिस्तानात जाण्यास सांगितले. तसेच पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्या कमी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच पाकिस्तानकडून हवाई किंवा भूपृष्ठ मार्गाने होणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाणघेवाण स्थगित केली आहे. पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांत प्रवेश करण्यास निर्बंध घातले आहेत. तसेच भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानातील बंदारात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.