Auraiya Court Decision : उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये २७ जून २०२४ मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत एका आईने आपल्याच तीन मुलांची पाण्यात बुडवून हत्या केली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने निकाल दिला असून संबंधित महिलेला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणात याच महिलेच्या एका ९ वर्षांच्या मुलाची साक्ष महत्वाची ठरली आणि न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हा मुलगा तिच्या जीवे मारण्याच्या प्रयत्नातून वाचला होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सैफ अहमद यांनी गुरुवारी ही फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी न्यायालयाने म्हटलं की, ‘जी महिला स्वतःच्या मुलांना मारू शकते ती समाजात राहण्यास पात्र नाही’, असं न्यायालयाने म्हटलं. दरम्यान, या प्रकरणातील महिलेच्या प्रियकरालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, एका आईने तिच्या प्रियकराबरोबर मिळून तिच्या निष्पाप मुलांना बुडवण्याचा कट रचला आणि हत्या केली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी प्रियांकाला २.५ लाख रुपये आणि आशिषला १ लाख रुपये दंड ठोठावला. तसेच न्यायालयाने एकत्रित दंडाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम वाचलेल्या मुलाला देण्याचा आदेश दिला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांकाचे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर आशिषबरोबर प्रेमसंबंध होते. २७ जून २०२४ रोजी प्रियांका आशिषबरोबर तिच्या चार मुलांना देवरपूरमधील सेंगर नदीकाठी घेऊन गेली होती. त्यांनी मुलांना एकामागून एक पाण्यात फेकून देण्यापूर्वी त्यांना औषध दिलं होतं. मात्र, यावेळी स्थानिकांनी पाहिलं आणि एका मुलाला वाचवलं. याच मुलाने या प्रकरणाच्या निकालात महत्त्वाची साक्ष दिली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्रियंका आणि आशिष दोघांनाही अटक केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं.
समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेला तिचे चारही मुले तिच्या प्रियकराबरोबर तिला अवैध संबंधात मोठा अडथळा बनत होते. त्यामुळे पतीच्या निधनानंतर प्रियांकाने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्यांची हत्या केली होती. आता या प्रकरणात न्यायालयाने या प्रकरणाला अतिशय घृणास्पद म्हटलं आहे.