उत्तर प्रदेशमधील भदोही येथील एका दुर्गापूजा मंडपास आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीनवर पोहचली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा आणि एका महिलेचा समावेश आहे. अशी माहिती भदोहीचे डीएम गौरांग राठी यांनी दिली आहे.

काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. आग लागल्यानंतर जवळपास २० मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यानंतरही बराचवेळ आग आटोक्यात आली नव्हती.

आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आग लागली तेव्हा आरती सुरू होती आणि मंडपात जवळपास १५० जण उपस्थित होते. आगीत होरपळलेल्या ५२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीत होरपळलेल्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एक असणाऱ्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.