उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी गुरूवारी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांचा राजीनामा स्वीकारला. सत्ताधारी पक्षाकडून राज्यसभेत बोलू दिले जात नसल्याचे सांगत मंगळवारी मायावती यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. रालोआ सरकारच्या काळात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आपल्याला राज्यसभेत बोलून दिले जात नसल्याचा आरोप यावेळी मायावतींनी केला होता. त्या सभागृहात उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांच्या मनानुसार त्यांना बोलण्यासाठी संधी दिली गेली नाही. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशारा मायावतींनी दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपचे खासदार काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मायावती सभात्याग केला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मायावती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात राजीनामा देण्यासाठी जात असताना मायावती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी सभापतींचं कार्यालय गाठून मायावती यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत मायावती यांनी सभापतींकडे राजीनामा सुपुर्द केला.

वेळ पडली तर आम्ही मायावतींना राज्यसभेवर पाठवू- लालू प्रसाद यादव

त्यानंतर त्यांच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थही काढण्यात आले. मायावतींनी मोठ्या विचारपूर्वक केलेली ही कृती असून पुढील वाटचालीसाठी त्यांनी खेळलेला हा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमधील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केशवप्रसाद मौर्य हे फुलपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. परंतु, त्यांचा उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून राज्याचे ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून यावे लागणार आहे. त्यामुळे फुलपूर लोकसभा मतदारसंघातून मायावती निवडणुकीसाठी उभ्या राहू शकतात. बसपसाठी ही जागा खूप महत्वाची आहे. या मतदारसंघातून बसपचे संस्थापक कांशीराम यांनी १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या (सप) जंगबहादूर पटेल यांनी कांशीराम यांचा २० हजार मतांनी पराभव केला होता. फुलपूर मतदारसंघात दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे मायावती या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. जर त्यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाआघाडीच्या त्या संयुक्त उमेदवार राहू शकतात. बसप, सप आणि काँग्रेस ही पोटनिवडणूक एकत्रित लढू शकतात. वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीची ही तयारी मानली जाते. जर फुलपूरमधून मायावती यांनी विजय मिळवला तर त्यांच्यासाठी हे मोठे यश असेल. कारण बसपची राज्यातील ताकद मोठ्याप्रमाणात घटली आहे. २००७मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व मिळवले होते. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

सहानुभूतीचा केविलवाणा प्रयत्न?