भाजपला गुजरातमध्ये पराभूत केले जाऊ शकते का? आपल्याच राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजयाची नामुष्की स्वीकारावी लागणार का? देशातील राजकीय वातावरणाला नाटय़मय वळण लागेल का? असे अनेक प्रश्न आहेत. हे सगळे आडाखे- अंदाज मी दोन महिन्यांपूर्वी फेटाळले असते. पण आता जरा वेगळी परिस्थिती आहे. भाजप हा गुजरातमधील केवळ सत्ताधारी पक्ष उरलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये जशी डाव्यांची मक्तेदारी होती तशी गुजरातमध्ये भाजपची आहे. १९९१च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप या राज्यात एकही निवडणूक हरलेला नाही. त्यानंतरच्या पाच विधानसभा निवडणुकांत भाजपने काँग्रेसवर मात केली. भाजपचे वर्चस्व हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यामुळे गुजरातच्या संपूर्ण समाजावर भाजपने कब्जा केला. उद्योग, व्यापार, सहकार, माध्यमे, शिक्षण संस्था यात सगळीकडे भाजपचे वर्चस्व निर्माण झाले. काँग्रेस हा अत्यंत नगण्य असा विरोधी पक्ष म्हणून तग धरून राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तरी गुजरातमधून येणाऱ्या बातम्यांकडे मी लक्ष देत नाही. कारण पंतप्रधान गुजरातचे असताना तेथे भाजपचा आणखी एक विजय अपेक्षितच आहे. सीएसडीएसच्या चमूने ऑगस्ट महिन्यात पहिल्या पाहणीचा निष्कर्ष जाहीर केला तेव्हा त्यात भाजपची मोठी आघाडी होती. ती तोडणे अवघडच दिसत होते. डाव्या आघाडीच्या जोमाच्या काळात पश्चिम बंगालमध्ये त्यांचा विजय ही काही बातमी नसायची, कारण ते ठरलेलेच होते. पण त्याच तर्काने मक्तेदारी निर्माण झालेल्या पक्षाचा पराभव हा भूकंप असतो; पण तो काही रोज होत नाही.

गुजरातेत सगळे आलबेल आहे अशातला भाग नाही. गुजरातचे कथित विकास प्रारूप हे केवळ मृगजळ होते, ते प्रारूप काही क्षेत्रात मिळालेल्या यशावर आधारित होते. शिक्षण व आरोग्य या दोन्ही सामाजिक निकषांत गुजरातची कामगिरी मध्यम राहिली आहे. विकासाच्या प्रारूपाने शेतक ऱ्यांच्या जीवनात काहीही बदल घडवून आणला नाही हे सत्य आहे. मोदी मुख्यमंत्रिपदावर असतानाही तेथे शेतक ऱ्यांची आंदोलने झाली होती. मोदी दिल्लीला गेल्यानंतर गुजरातची स्थिती आणखीनच खालावली. दरम्यान, ग्रामीण भागातील नाराजी वाढत गेली, सरकारने दोन दुष्काळ पडल्याचे मान्य करूनही पुरेशी मदत दिली नाही. गेल्या वर्षभरात गुजरातमधील ग्रामीण भागात खूपच अस्वस्थता पसरली. दुसऱ्या कुठल्याही राज्यात अशी परिस्थिती असती तर सत्ताधारी पक्षाचा पराभव हा ठरलेला होता, पण गुजरातची गोष्ट वेगळी आहे. लोकांची नाराजी असणे, त्यांचा भ्रमनिरास झालेला असणे, ते सरकारवर संतापलेले असणे या कुठल्याही गोष्टी गुजरातमध्ये भाजपची सत्ता जाण्यास पुरेशा नाहीत असे मला वाटते. गुजरातमध्ये काँग्रेसच्या रूपाने भाजपला त्यांना हवा तसा विरोधी पक्ष लाभला आहे. काँग्रेसला ना कुठली दृष्टी, ना धोरण, ना विश्वासार्ह नेता अशी स्थिती आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल असा सांगावा घेऊन येणाऱ्या कुणालाही मी एकच सांगतो, लोक नाराज आहेत हे सांगू नका, ते भाजपचा पराभव करतील इतके विद्यमान राजवटीवर संतापले आहेत का? जर तसे असेल तर ते काँग्रेसला मत देणार अशी परिस्थिती आहे का.. याचा विचार करा.

मला आता असे वाटते, की लोक एवढे संतापले आहेत की ते भाजपची सत्ता मतदानातून उलथवून टाकतील. एके काळी पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीची सत्ता गेली, तेव्हाही असे कुणाला वाटले नव्हते. आता गुजरातमध्येही हा विचार वेडेपणाचा वाटेल, पण तेथे भाजपचा पराभव होणार व काँग्रेसचा स्पष्ट विजय होणार असे मला वाटते.

मला येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती म्हणजे, माझा हा अंदाज राजकीय अग्रक्रमातून नाही किंवा कुठल्याही व्यक्तिगत किंवा आत्मनिष्ठ मूल्यमापनाच्या आधारे मी हे म्हणत नाही. लोकपातळीवर काय प्रवाह आहेत ते जाणून मी माझी ही मते मांडली आहेत. लोकनीती व सीएसडीएस चमूने एबीपी न्यूजसाठी तीन टप्प्यांत जी पाहणी केली त्याच्या आधारे मी या निष्कर्षांप्रत आलो आहे. या तीनही पाहणी अहवालांत राज्याच्या विविध भागांतील ५० मतदारसंघ व ३५०० प्रतिसादक यांचा समावेश होता. आता ही माहिती मी त्यांच्या विविध पक्षांच्या मतांच्या टक्केवारीतील अचूकतेवर माझा विश्वास असल्याने (उत्तर प्रदेश निवडणूक वगळता) वापरलेली नाही. तर या पाहणी अहवालातील सर्व माहिती अत्यंत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे वापरली आहे. [http://www.lokniti.org/pdf/Gujarat-Tracker-3-Report.pdf] लोकनीती व सीएसडीस यांच्या निवडणूक सर्वेक्षण चमूच्या स्थापनेत माझाही वाटा होता, पण आता गेल्या चार वर्षांपासून माझा त्यांच्याशी संबंध नाही हेही येथे नमूद करावेसे वाटते. पहिल्या पाहणी अहवालात त्यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेसला तीस टक्केवारी गुणांक (पर्सेटेज पॉइंट)आघाडी मिळेल असे म्हटले होते, नंतर दुसऱ्या पाहणीत ही आघाडी नाटय़मयरीत्या बदलून ऑक्टोबरमध्ये सहा टक्के गुणांकावर (पर्सेटेज पॉइंट) आली. तो काही अनियमितपणा होता, की खरोखर जनमताचा कल होता, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर नोव्हेंबरमध्ये या पाहणीचा जो अलीकडचा टप्पा झाला त्यातून मिळते. तिसऱ्या फेरीतील निष्कर्षांनुसार ही आघाडी आता शून्यावर आली आहे व दोन्ही पक्षांचा मतवाटा हा ४३ टक्के गुणांक (पर्सेटेज पॉइंट) झाला आहे. अगदी स्पष्ट सांगायचे तर सीएसडीएस पथकाने भाजपच्या पराभवाचे भाकीत केलेले नाही. त्यांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात निवडणुका झाल्या तर भाजपला ९१-९९ जागा मिळतील असे म्हटले आहे. पण मतदानाच्या दिवशी काय होईल याचे उत्तर लोकनीती-सीएसडीएस व एबीपी यांच्या जनमत चाचणीने दिलेले नाही.

मला असे वाटते हा पुढच्या टप्प्यातील जो भाग आहे त्यात मला भाजपचा पराभव स्पष्ट दिसतो आहे. कारण शेवटच्या आठवडय़ांमध्ये सातत्यपूर्ण असलेला जनमत कौल बदलत नसतो. उलट सर्वेक्षणानंतर मतदानापर्यंतच्या काळाचा विचार केला तर मला यात भाजपची आघाडी ऋण होण्याची शक्यता वाटते. दोन पक्षांच्या आमनेसामने लढतीत, चार किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुणांकापेक्षा जास्त आघाडी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ शकत नाही. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात अनेकदा सत्ताधारी पक्षाला अंदाजात काहीसे झुकते माप मिळण्याचा धोका असतो. त्यामुळे आता आपण सध्याच्या अवस्थेत मोठय़ा आघाडीची अपेक्षा करीत आहोत. वेगवेगळ्या सर्वेक्षण अहवालांनी याच प्रकारे निष्कर्ष काढले आहेत. गुजरात सरकारचे मान्यता गुणांकन हे सातत्याने कमी झाले आहे व ते धोक्याची रेषा ओलांडून खाली आले आहे. जे मतदार या सरकारला आणखी एक संधी देऊ इच्छित होते त्यांच्यापेक्षा संधी न देणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे. तेथील मुख्यमंत्र्यांचा लोकप्रियता गुणांक (मानांकन) कमी झाला आहे, पण तरी ते प्रतिस्पध्र्यापेक्षा पुढे आहेत. अगदी पंतप्रधान व त्यांच्या सरकारचे गुणांकन किंवा मानांकन घसरले आहे, पण अजूनही मोदी हे लोकप्रिय नेते आहेत यात शंका नाही. हार्दिक पटेलच्या वादग्रस्त सीडी किंवा जातीय प्रश्न यासारख्या मूळ गोष्टींवरून लक्ष हटवणाऱ्या गोष्टींचा फारसा परिणाम होईल असे दिसत नाही. या सर्वेक्षणातून एक गोष्ट पुढे आली आहे, ती म्हणजे गुजरातच्या निवडणुकीत आर्थिक मुद्दाच केंद्रस्थानी आहे. मतदारांना बेरोजगारी व महागाईची चिंता आहे. कारण याच गोष्टींमुळे लोकांची क्रयशक्ती कमी होत असते.

हे केवळ एक सर्वेक्षण नाही तर गुजरातमधील परिस्थितीवर शिक्कामोर्तब करणारी विश्वासार्ह माहिती आहे. भाजपच्या प्रचारसभा पाहिल्या तर मोदी यांच्यासह कुणाही नेत्याला गर्दी खेचता आलेली नाही. त्याचबरोबर हार्दिक पटेल मात्र मोठी गर्दी खेचत आहे. शेतकऱ्यांचा राग आधीपासून आहे, आता त्यात शेंगदाणा व कापसाच्या दराबाबत नाराजीची भर पडली आहे. गुजराती व्यापाऱ्यांना भाजपने विश्वासघात केल्यासारखे वाटते आहे.

मग या परिस्थितीत काही बदल शक्य आहे का, मोदींच्या प्रचारसभांमध्ये तर पूर्वीची जादू राहिलेली नाही. मतदानात फेरफार करण्याचे काय.. असाही मुद्दा आहे, पण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळे करता येतात या मताचा मी नाही. अनेकांनी तशा कटकारस्थानांचे सिद्धांत पंजाब व उत्तर प्रदेश निवडणुकीत मांडले. पण गुजरात निवडणुकीत मतदान केल्यानंतर त्याची खातरजमा करणारी माहिती व्हीव्हीपीएटी यंत्राद्वारे मतदारांना दिली जाणार आहे. त्यामुळे या मतदान केल्यानंतरच्या चिठ्ठय़ा व प्रत्यक्ष मतदान यांची जुळणी सहज करता येईल, त्यामुळे मतदान यंत्रात फेरफार करण्याचा मुद्दा बाजूला पडतो.

योगेंद्र यादव

yywrites5@gmail.com

मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in gujarat legislative assembly election 2017
First published on: 07-12-2017 at 03:27 IST