रंगपंचमी खेळताना चूकून मोबाइल फोन पाण्यात पडू शकतो. अन् फोन पाण्यात पडला की तो कामातून गेला असाच आपला समज होतो. तरीही त्याआधी काही सोपे उपाय करुन बघूया म्हणून अनेक जण घरच्याघरी हा मोबाईल वाळवण्याचा प्रयत्न करतात. फोन सुरु व्हावा यासाठी मग तो उन्हात ठेवणे किंवा अगदी ओव्हनमध्ये ठेवण्याचेही प्रकार होतात. मात्र यांसारख्या चुकीच्या पद्धतींमुळे फोन आणखी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे रंगपंचमी खेळताना तुमचा फोन पाण्यात भिजला असले तर तो कशा पद्धतीने वाळवावा यासाठीच्या काही स्मार्ट टिप्स…ज्यामुळे कोणताही खर्च न करता सोप्या उपायांनी हा फोन तुम्ही पुन्हा पूर्ववत करु शकाल.

१. मोबाईल फोन भिजला असेल तर तातडीने त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

२. फोनची बॅटरी आणि कार्डस काढल्यानंतर त्याचे इतर पार्टस वेगळे करणंही तितकंच गरजेचं आहे. हे कोरडे करण्यासाठी टिश्यू पेपर किंवा सुती कपड्याचा वापर करा. त्यामुळे अगदी कोपऱ्यातून फोन पुसता येऊ शकेल.

३. भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात किंवा डब्यात ठेवा. त्यानंतर हे भांडे सूर्यप्रकाशात किंवा सामान्य उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवस ठेवा. फोन आपोआप कोरडा होण्यास मदत होईल.

४. तांदळाच्या भांड्यात मोबाईल ठेवायचा नसेल तर सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक आणि मोबाईल एका शूज बॉक्समध्ये ठेवावे. सिलिका जेल पॅकमध्ये तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

५. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने २० ते ३० मिनिटं कोरडा करा. मात्र या व्हॅक्यूम क्लिनरला ब्लोअर असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलच्या आत गेलेलं पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र अशाप्रकारे फोन वाळला तरीही तो सुरु करण्याची घाई अजिबात करु नये.

हे करणं टाळा

ओला मोबाईल कधीही हेअर ड्रायरने वाळवू नये. ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो. प्रखर उन्हात फोन ठेवल्यानेही तो खराब होऊ शकतो.