नुकतीच संपलेली अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका भारतीय संघासाठी आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीची शेवटची मालिका होती. या मालिकेत भारतीय खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेसाठी दावेदारी सिद्ध करण्याची संधी देण्यात आली. भारतीय संघानं दमदार कामगिरी करत मालिका खिशात घातली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज असल्याचं बोललं जात आहे. तुलनेनं दुबळ्या अफगाणिस्तान संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना, त्यातही सामन्याचा शेवट मोठा रंजक ठरला. आधी टाय, नंतर पहिली सुपरओव्हर आणि शेवटी दुसऱ्या सुपर ओव्हरनंतर या सामन्याचा निकाल लागला. क्रिकेट चाहत्यांसाठी निव्वळ औपचारिकता ठरलेल्या या सामन्याचा शेवट मोठा अनपेक्षित असाच ठरला! दोन सुपरओव्हरचा प्रसंग विरळा! भारतीय संघाचं २१३ धावांचं लक्ष्य अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सर्व आडाखे फोल ठरवत जवळपास पार केलं होतं. पण विजयासाठी आवश्यक असलेली एक धाव करण्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांना यश आलं नाही. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवावी लागली. पण तीही टाय झाल्यामुळे पुन्हा दुसरी सुपर ओव्हर खेळवली गेली. यावेळी मात्र भारतानं बाजी मारली आणि सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला. अफगाणिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने पहिली फलंदाजी करताना १६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्मा-यशस्ली जैस्वाल जोडीनं फटकेबाजी केली खरी. पण रोहित शर्मा रिटायर्ड आऊट झाला. भारतालाही १६ धावाच करता आल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहितसह रिंकू सिंह खेळायला उतरले. भारतानं या ओव्हरमध्ये १२ धावा केल्या. यावेळी मात्र अफगाणिस्तानचे फलंदाज सहा चेंडूंत फक्त २ धावा करू शकले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. सुपरओव्हर चर्चेत! आता या दोन सुपरओव्हरवर चर्चा सुरू झाली आहे. आत्तापर्यंत एकच सुपरओव्हर ऐकिवात असताना दोन सुपर ओव्हर खेळवल्या गेल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. अशा प्रकारे दोन सुपर ओव्हर खेळवता येतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यासंदर्भात ICC ची नियमावली नेमकं काय सांगते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल. सामना अनिर्णित किंवा टाय ठरल्यास… मेरिलबोन क्रिकेट क्लबकडून तयार करण्यात आलेली क्रिकेटसंदर्भातली नियमावली आयसीसीकडून आधारभूत मानली जाते. या नियमावलीमध्ये सुपर ओव्हर्ससंदर्भात नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमावलीतील १६.३.१ कलमान्वये जर एखादा सामना टाय झाला तर सामन्याचा निकाल घेण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. सुपर ओव्हर म्हणजे सोप्या शब्दांत ६ चेंडूंचा सामना. या षटकातही दोन्ही बाजूच्या फलंदाजांना सारख्याच धावा करता आल्या, तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाऊ शकते. जोपर्यंत अशा प्रकारे सुपर ओव्हर खेळवता येणं अशक्य असेल किंवा विजेत्याची निवड करण्यासाठी आवश्यक सुपर ओव्हर खेळवण्यासारखी परिस्थिती नसेल, तोपर्यंत अशा ओव्हर्स घेता येऊ शकतात. एकदा का अशी परिस्थिती ओढवली, की नंतर तो सामना अनिर्णित घोषित केला जातो. IND vs AFG : भारताचा २१२ धावांचा डोंगर, गुलबदीन-नबीचा प्रतिहल्ला, मॅच टाय; दोन सुपरओव्हरनंतर विजयी सुस्कारा! सुपर ओव्हर खेळवण्यासाठीचे नियम.. दरम्यान, सामन्याचा निकाल येण्यासाठी किती सुपर ओव्हर्स खेळवाव्यात, यासाठी आयसीसीकडून नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे… १. सुपर ओव्हरमध्ये एका ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला दोन गडी बाद होईपर्यंतच फलंदाजी करता येईल. २. सामन्याच्याच दिवसी सुपर ओव्हर खेळवता येईल. सामना संपल्यानंतर पुढच्या ५ मनिटांत सुपर ओव्हर सुरू करावी लागेल. सामन्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेशिवाय देण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेमध्येच सुपर ओव्हर खेळवता येईल. प्रत्येक अतिरिक्त सुपर ओव्हरसाठी २० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ठरवून दिलेला वेळ संपल्यानंतर ती सुपर ओव्हर संपल्याचं जाहीर करण्यात येईल. ३. सामना झाला त्याच खेळपट्टीवर सुपर ओव्हर खेळवावी लागेल. यासंदर्भातील अंतिम निर्णय पंचांचा व सामनाधिकाऱ्यांचा असेल. ४. सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज सुपर ओव्हरमध्ये आधी फलंदाजी करतात. ५. प्रत्येक संघाला एक रिव्यू घेण्याची संधी असेल. ६. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा त्याने ठरवलेला खेळाडू सुपर ओव्हरसाठी चेंडूची निवड करेल. पण हा चेंडू नवा नसून जुना चेंडूच असेल. एकाहून अधिक सुपर ओव्हर्स खेळवाव्या लागल्या, तर प्रत्येक संघ त्यांनी निवडलेले चेंडूच वापरतील. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ पुढच्या सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी करेल. दोन सुपर ओव्हर्समध्ये ५ मिनिटांचा कालावधी असेल. ७. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेला फलंदाज पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही. त्याचप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेला गोलंदाज पुढच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. ८. सुपर ओव्हर काही कारणास्तव बाद किंवा रद्द ठरवण्यात आल्या, तर तो सामना अनिर्णित घोषित केला जातो. Ind vs Afg: रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊट यातला नेमका फरक काय? रोहित शर्माचं दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये खेळणं नियमाला धरुन होतं का? रोहित शर्माच्या फलंदाजीवरून वाद! दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये झालेल्या दोन्ही सुपर ओव्हर्समध्ये भारताचा कर्णधार व सलामीवीर रोहित शर्मानं फलंदाजी केली. नियमानुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केलेल्या फलंदाजाला पुढच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करता येत नाही. त्यामुळे कोणत्या नियमानुसार रोहित शर्माला पंचांनी पुन्हा फलंदाजी करण्याची परवानगी दिली? यावर आता चर्चा चालू आहे.