Wedding Akshata Rice : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे हा सोहळा विधिवत आणि शुभ मुहूर्तावर पार पाडण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. मंगळसूत्र, वरमाला घालण्यापासून ते अक्षता टाकण्यापर्यंतचे अनेक विधी भटजीने दिलेल्या मुहूर्तावर पार पाडले जातात. या प्रत्येक विधीला खूप महत्त्व असते. हे सर्व विधी नीट पार पडल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून येते. पण, या लग्नसोहळ्यात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? आणि अक्षता या शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घेऊ…

अक्षता शब्दाचा नेमका अर्थ काय?

लग्नाच्या मुहूर्तावर भटजी मंगलाष्टका बोलण्यास सुरुवात करतो, यावेळी शुभ मंगल सावधान हे मंगलाष्टकेचा शेवटचं कडव पूर्ण होताच नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि त्यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर त्यांचं लग्न लागलं किंवा पूर्ण झालं असं म्हणतात. पण यातील अक्षता शब्दांचा नेमका अर्थ काय हे आपण ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ.

मंगल कार्यात अक्षता का वापरतात?

पूजा किंवा मंगल कार्यात औक्षणप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या कुंकूमिश्रित अखंड तांदळाला अक्षता म्हणतात. संस्कृतमधील अक्षत हा मूळ शब्द. क्षत म्हणजे जखम आणि अक्षत म्हणजे सुरक्षित, कल्याणकारी किंवा दुःखविरहित. तांदूळ हे एकच धान्य असे आहे की, ज्याला आतून कीड लागत नाही.

म्हणूनच शुद्ध चारित्र्य किंवा शुद्धतेला त्याची उपमा दिली जाते. तांदूळ पेरल्यावर जे रोप उगवते, ते काढून दुसरीकडे लावले तरच ते बहरते. मुलींचे आयुष्यही तसेच असते. मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे आणि नंतर ती दुसऱ्या घरी जाते आणि तेथे बहरते. तशी ती बहरावी म्हणूनच मस्तकी अक्षता टाकण्याची पद्धत रूढ झाली. ज्ञानदेव लिहितात, ‘ते गा बुद्धि चोखणिशी। जाण येथ राजसी। अक्षत टाकली जैसी। दियेसी ।।’

अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. आजही कोणत्याही मंगल कार्यात अक्षता दिल्या जातात. लग्न-मुंजीच्या प्रसंगी, तसेच अनेकांच्या गावी काही मंगल कार्यासाठी निमंत्रण देताना एक श्रीफळ आणि बरोबर थोड्या अक्षता देण्याचा प्रथा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, हल्ली काही जण लग्न समारंभात तांदळाचा अपव्यय टाळण्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करीत असल्याचे दिसते. नाही तर नुसत्या टाळ्या वाजवूनही हा लग्न समारंभ पार पाडला जातो.