– चैतन्य प्रेम

घर आणि जग यांच्यामध्ये असतो तो उंबरठा! या उंबरठय़ाचं फार सुंदर रूपक अवधूतानं योजलं आहे. पण त्या रूपकाचं खरं मर्म पटकन लक्षात येत नाही. एखादी व्यक्ती संकुचितपणा झुगारून व्यापक होते, चौकट ओलांडून मुक्त होते, तेव्हा आपण त्या व्यक्तीनं उंबरठा ओलांडला, हा शब्दप्रयोग करतो. इथं मात्र तो अगदी वेगळ्या दिशेनं अभिप्रेत आहे! इथं बाहेरून आत आणणारा उंबरठा ओलांडायचा आहे. म्हणजे जगातील वणवण थांबवून उंबरठा ओलांडून पुन्हा निजात्मशांतीच्या मूळ घरात प्रवेश करायचा आहे! अवधूत सांगतो, ‘‘आलिया मनुष्यदेहासी। मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी। लव निमिष येकु दिशीं। यावज्जन्मेंसीं मोकळा।।६३६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सात). उंबरठय़ाशी आलो म्हणजे घरापाशीच आलो. आता दार उघडलं गेलंय, तर फक्त उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करणं बाकी आहे! हा उंबरठा आहे देहबुद्धीचा, देहभावाचा. जगातला आमचा वावर याच देहबुद्धीच्या जोरावर सुरू आहे. त्या देहभावाच्या उंबरठय़ापाशी आम्ही अनंत जन्म अडखळतो आहोत. तो उंबरठा ओलांडून निजात्मशांतीच्या घरात प्रवेश करायची आम्हाला जन्मोजन्मी भीती वाटत आली आहे. बाहेरच्या जगात आम्हाला सुरक्षित वाटतं! खरी शांती, तृप्ती, सुख, समाधान बाहेरच्याच जगात मिळेल, या भ्रामक धारणेतून आम्ही बरीच वणवण केली. चित्त पोळणारे दाहक उन्हाळे, बुद्धी गोठवणारी कडाक्याची थंडी, मनाला फटकारणारा पावसाचा झंझावात हे सगळं सहन करीत आम्ही तरीही त्याच जगात मानसिक स्थैर्य, शांती शोधत राहिलो. कित्येकदा ठेचकाळलो; पण भानावर आलो नाही. थंडी, पाऊस, उन्हापासून रक्षण करणाऱ्या घरात कधी पाऊल ठेवायचा प्रयत्नच केला नाही! हा उंबरठा ओलांडण्याची फार मोलाची संधी मनुष्यजन्मानं दिली आहे. अनंत जन्मांपासून दुरावलेल्या हक्काच्या घरात हा उंबरठा ओलांडून प्रवेश करण्यास बळ देण्याइतपत क्षमताही लाभल्या आहेत! त्यांचा योग्य वापर केला, तर हा उंबरठा ओलांडणं अवघड नाही. पण मोह, आसक्ती आणि कामनेनं देवसुद्धा या उंबरठय़ाशी अडखळले आहेत! अवधूत सांगतो, ‘‘विद्वांस आणि वैराग्य। तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य। वृथा आसक्तीं केले अभाग्य। शिश्नोदरा साङ्ग वेंचले।। ६३८।।’’ म्हणजे, ‘‘विद्वत्ता आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी असणं, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य ब्रह्मादिकांनाही प्राप्त होत नाही!’’ फार मोठं विधान आहे बरं हे! पण या विधानालाही मागे टाकणारं आणखी मोठं विधान अवधूत करतो आणि म्हणतो की, ‘‘देवयोनी लाभूनही केवळ आसक्तीमुळे अभागी ठरून ब्रह्मादी देवदेखील कामनापूर्ती आणि जिव्हातृप्तीच्या खोडय़ात अनेकदा अडकून पडले आहेत.’’ कामनेत आणि मोहात गुरफटून प्रत्यक्ष देवराज इंद्रदेखील काही प्रसंगी सामान्य माणसापेक्षाही हीन वागला आहे, याचे दाखले आमच्या पुराणांमध्ये अगदी स्पष्टपणे नोंदले आहेत. आणि म्हणूनच देवांचा राजा असूनही इंद्राची पूजा कुणी करीत नाही की त्याची स्तोत्रं, उपासना होत नाही. जी काही पूजा गोकुळात सुरू होती ती कृष्णानं गोवर्धन लीला करीत मोडून टाकली! विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही की भले तुम्ही देवांचे राजे व्हाल, पण हृदय सिंहासनावर बसू शकाल, असं नाही! ज्याला सदोदित आपलं पद जाण्याची भीती छळत असते आणि ते पद वाचविण्यासाठी प्रसंगी कपटाचाही आधार घ्यावा लागतो त्या इंद्रपदाची प्राप्तीदेखील खरं समाधान देत नाही! अगदी देवयोनीलाही दुर्लभ असं ते समाधान मनुष्याच्या मात्र आवाक्यात आहे!