'आएगा तो मोदी ही', यावरुन सोशल मीडियावर ट्रोल केले जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. 'आएगा तो मोदी ही' हा काही विनोद नाही, हे वास्तवच आहे, देशातील जनतेनेच हे ठरवले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांना 'आएगा तो मोदी ही' यावरुन सोशल मीडियावर सुरु असलेल्या विनोदांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, जर कोणाला यात विनोद दिसत असेल ती व्यक्ती अशा गंभीर चर्चेसाठी पात्र नाही. हा विनोद नाही, हे वास्तव आहे. देशातील जनतेनेच ठरवले आहे. कोणत्याही समस्येवर युद्ध हा तोडगा नाही. मात्र, समर्थ व्यक्तीलाच शांतता लाभते. जर दक्षिण आशियात शांतता रहावी असे वाटत असेल तर भारताने सामर्थ्य दाखवले पाहिजे, असे मोदींनी सांगितले. महात्मा गांधी हे श्रेष्ठ होते. पण एका कुटुंबांचे गुणगान करताना आपण महात्मा गांधी यांच्यावर अन्याय केला, असे मोदींनी नमूद केले. राजकारणात तुम्ही वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. रील लाइफ आणि रिअल यात फरक असतो. मी स्वप्नांच्या जगात रमत नाही, असेही मोदींनी म्हटले आहे. निवडणुकीनिमित्त देशभरात फिरत आहे. मी गेल्या पाच वर्षांत कार्यालयात बसून नव्हतो. मी जनतेसोबत जास्त वेळ होतो. या अनुभवाच्या आधारे मी सांगू इच्छितो की देशातील जनतेला मजबूत आणि निर्णायक सरकार हवे आहे, असेही मोदींनी आवर्जून सांगितले. देशातील विरोधी पक्ष एकत्र आले तर मला आनंदच आहे. पण प्रत्यक्षात विरोधीपक्ष एकत्र आलेले नाही. त्यांच्यातच संभ्रम आहे, असा आरोपही मोदींनी केला. एक वर्षापूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र होते, पण आता ते एकमेकांच्या विरोधात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २०१४ पेक्षा यंदा भाजपा जास्त जागांवर विजयी होणार, असा दावाही त्यांनी केला. मला माध्यमांनी मोठे केले नाही, मी मेहनत करुन इथपर्यंत पोहोचलो, असेही त्यांनी सांगितले.