सुहास बिऱ्हाडे

शिट्टी गेल्याने काँग्रेसच्या चिन्हाचा निवडणुकीत वापर करण्याचा निर्णय

गेली ३० वर्षे बहुजन विकास आघाडीकडे (बविआ) असलेले शिट्टी हे निवडणूक चिन्ह बहुजन महापक्षाने पळवल्याने आता काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय ‘बविआ’ने घेतला आहे.

वसई-विरारमध्ये गेल्या तीन दशकांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. सुरुवातीला काँग्रेस पक्षातून ठाकूर विधानसभेवर निवडून गेले आणि नंतर पक्ष सोडल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी चष्मा चिन्हावर लढवल्या होत्या. नंतर शिट्टी चिन्ह पक्षाला मिळाले आणि तीच त्यांची ओळख बनली होती. शिट्टी चिन्ह घेऊनच त्यांनी सर्व नगर परिषदा आणि पाठोपाठ सलग तीन वेळा महापालिका बहुमताने काबीज केली. पक्षाचा खासदार आणि तीनही आमदार शिट्टी चिन्हावर निवडून गेले होते. आता बहुजन महापक्षाने शिट्टी चिन्ह केंद्रीय स्तरावर नोंदणी केल्याने पक्षाची अडचण झाली होती. तरी पक्षाने बहुजन महापक्षाची समजूत काढून त्यांचा पाठिंबा मिळवला होता. मात्र मंगळवारी अचानक बहुजन महापक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि बहुजन विकास आघाडीला चिठ्ठी चिन्हाला मुकावे लागले.

आता कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची, असा प्रश्न पक्षापुढे होता. बविआची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या पक्षांबरोबर युती आहे. परंतु पक्षाने हात चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने दिली. आम्ही हात चिन्हावर निवडणूक लढवू आणि आमच्याविरोधात खेळी करणाऱ्या शिवसेनेला पाणी पाजू, असे या नेत्याने सांगितले. बहुजन महापक्षाचे अध्यक्ष शमशुद्दीन खान हे शिवसेना नेत्यांना भेटल्याचे छायाचित्र उपलब्ध  झाल्याने या षड्यंत्रामागे शिवसेना असल्याचे सिद्ध झाल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

चिन्ह बदलले तरीही..

पक्षाचे संघटक सचिव आणि प्रवक्ते अजीव पाटील यांनी आमच्यापुढे अनेक पर्याय असल्याची माहिती दिली. तीस वर्षांत तीनदा आम्ही निवडणूक चिन्ह बदलले आणि प्रत्येक वेळी बहुमताने जिंकून आलो, असे पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघातील सर्व मतदार हा सुशिक्षित आहे. चिन्ह बदलल्याने ते गोंधळणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. बहुजन महापक्षाने आम्हाला एबी अर्ज आणि इतर कागदपत्रे दिलेली होती. परंतु शिवसेना घाबरली असून रडीचा डाव खेळत पक्षाला फितवले आणि आमचे चिन्ह काढून घेतले, असे ते म्हणाले. चिन्ह बदलल्याने काहीच फरक पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शमशुद्दीन खान अज्ञातवासात

बहुजन महापक्षाचे अध्यक्ष शमशुद्दीन खान यांनी शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळवल्यापासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. माझ्या जीवाला धोका असल्याचे खान यांनी तेव्हा सांगितले होते. आता त्यांनी बविआचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर ते अज्ञातवासात रवाना झाले आहे. त्यांच्या कार्यालयात संपर्क केला असता त्यांचा ठावठिकाणा कळू शकलेला नाही.