दुष्काळ निवारणाच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची महाराष्ट्राची मागणी निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून आदर्श अचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली होती. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला महाराष्ट्रात मतदानाची प्रक्रिया संपली. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये ४८ जागांवर मतदान पार पडले.

हा जनहिताचा मुद्दा असल्याने आपल्याला या प्रस्तावावर आक्षेप नसल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे. मतमोजणीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्र्यांनी आपल्यासोबत दौऱ्यावर नेऊ नये असे आयोगाने निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु असताना अनेक भाग गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत होते. लोकांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. चारा, पाण्याविना जनावरांचे हाल होत आहेत. लोकांना पाण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावी लागत आहे. आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे दुष्काळी निवारणाच्या कामाला वेग मिळेल.