चार टप्प्याच्या मतदानानंतर विरोधकांचा पराभव निश्चित झाला आहे. आता उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भाजपाचा विजय किती भव्य असेल आणि विरोधकांच्या पराभवाचे अंतर किती मोठे असेल एवढेच ठरणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुझफ्फरपूर येथील प्रचारसभेत म्हणाले. जे तुरुंगात आहेत, जे तुरुंगाच्या दरवाजावर आहेत, जे बेलवर आहेत, जे जामिनासाठी कोर्टामध्ये फेऱ्या मारत आहेत त्या सर्वांना एक मिनिटासाठीही केंद्रामध्ये मजबूत सरकार नको आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

विरोधी पक्ष विजयासाठी निवडणूक लढवत नसून संपलेली ताकत अजून कमी करण्यासाठी ते निवडणूक लढत आहेत असे मोदी म्हणाले. त्यांना पुन्हा ताकत मिळाली तर बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य उरणार नाही. मुली घराबाहेर सुरक्षित राहणार नाहीत. अंधार पडल्यानंतर लोकांना घरात थांबावे लागेल असे मोदी म्हणाले.

आपल्या सरकारने गरीबी दूर करणारी धोरणे राबवतानाच प्रत्येक गरीबाच्या घरापर्यंत आम्ही वीज पोहोचवली असे मोदी म्हणाले. मोदींनी बिहारमध्ये एनडीएला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजप, लोक जनशक्ती पार्टी आणि जेडीयू या तीन पक्षांपैकी तुम्ही कोणालाही मतदान केले तरी तुमचा पाठिंबा मोदींनाच असेल असे मोदी म्हणाले.