केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी सोमवारी २६/११च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर टीका केली होती. गोयल यांच्या टीकेला विलासराव यांचा पुत्र अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. २६/११च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दिवंगत विलासराव देशमुख एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्याच्या चित्रपटात मुलाला काम मिळावं म्हणून ते धडपडत होते अशी टीका गोयल यांनी सोमवारी एका कार्यक्रमात केली होती.

पियुष गोयल यांना रितेश देशमुखनं ट्विटरवर एक पत्र पोस्ट करत खास आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे. यात रितेशनं पियुष गोयलं यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माझ्या वडिलांनी मला चित्रपटात काम मिळावे ते कधीच कुठल्या दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलले नाहीत आणि त्याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मात्र, जी व्यक्ती तुमच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिवंत नाही, तिच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. सर, तुम्ही थोडा उशीर केलात. सात वर्षांपूर्वी त्यांनी तुम्हाला उत्तर दिले असते. अशा प्रकारचे पत्र लिहीत रितेशनं पियुष गोयल यांना सडेतोड उत्तर दिले आहेत.

काय म्हणाले होते पियुष गोयल –

मी मुंबईकर आहे. तुम्हाला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आठवत असेल. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. हे सरकार कमजोर होते तीन दिवस येथे हल्लेखोर गोळीबार करीत होते तरी या सरकारे काहीही केले नाही. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ज्या ओबेरॉय हॉटेलमध्ये गोळीबार सुरु होता त्या हॉटेलच्या बाहेर एका निर्मात्याला घेऊन आले होते. या निर्मात्यांच्या चित्रपटात आपला मुलगा रितेशला भुमिका मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरु होती. पंजाबमधील लुधियाणा शहरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.