उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असताना एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकीचे आहेत, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सप-काँग्रेस आघाडीचा विजय हमखास आहे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. त्यावर ट्विटरातींनी त्यांची तुफान खेचली आहे. ‘न्यूज चॅनलवाले’…किमान एक्झिट पोलमध्ये तरी जिंकू द्या, असे राहुल गांधी म्हणत असल्याचे ट्विट करून त्यांची खिल्ली उडवली. तर काहींनी भाजपचीही खेचली आहे. निवडणुका कुणीही जिंकू दे, पण एक्झिट पोलमध्ये नेहमीच भाजपचा विजय होतो, असे ट्विटही करण्यात आले.