उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असताना एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकीचे आहेत, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सप-काँग्रेस आघाडीचा विजय हमखास आहे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. त्यावर ट्विटरातींनी त्यांची तुफान खेचली आहे. 'न्यूज चॅनलवाले'.किमान एक्झिट पोलमध्ये तरी जिंकू द्या, असे राहुल गांधी म्हणत असल्याचे ट्विट करून त्यांची खिल्ली उडवली. तर काहींनी भाजपचीही खेचली आहे. निवडणुका कुणीही जिंकू दे, पण एक्झिट पोलमध्ये नेहमीच भाजपचा विजय होतो, असे ट्विटही करण्यात आले. काँग्रेसचे उपाध्य़क्ष राहुल गांधी यांनी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल)चे अंदाज साफ चुकीचे आहेत, असे म्हटले आहे. अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशसह चार राज्यांत भाजप सत्तेच्या जवळ जाणार आहे. एक-दोन वृत्तवाहिन्यांचे अंदाज वगळता सर्वच पक्षांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नसून, क्रमांक एकचा पक्ष नक्कीच ठरेल असा अंदाज वर्तवलेला आहे. मात्र, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीचाच विजय होईल, अशी राहुल गांधी यांना खात्री आहे. आमच्या आघाडीचा नक्कीच विजय होईल. एक्झिट पोलचे अंदाज साफ चुकीचे आहेत, असे सांगून त्यांनी मागील बिहारमधील विधानसभा निवडणुकांवेळच्या एक्झिट पोलच्या अंदाजाचा दाखला दिला. बिहारमध्ये भाजपचा विजय होईल, असा अंदाज त्यावेळी एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. पण नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल-राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने सत्ता स्थापन केली. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, असेही ते म्हणाले. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर राहुल गांधी मात्र ट्विटरातींच्या निशाण्यावर आले. किमान एक्झिट पोलमध्ये तरी जिंकू दे, अशी विनंती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी वृत्तवाहिन्यांना म्हणत आहेत, अशा आशयाचे ट्विट एकाने केले आहे. (सौजन्य ः ट्विटर)