गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या राजकीय भवितव्याविषयी जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नसताना दुसरीकडे मनसे महायुतीचा भाग होणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींच्या विधानांचा दाखला दिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना राज ठाकरेंच्या सहभागाविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर टीका करतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावरही सडकून हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभा पाहाता ते महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सहभागी होतील, अशी शक्यता फेटाळून लावली जात आहे. “हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल; म्हणाले… राज ठाकरे भाजपावर व मोदींवर टीका करत असले, तरी दुसरीकडे मनसेच्या नेत्यांकडून भाजपाबरोबर युती करण्याच्या प्रश्नांवर स्पष्टपणे नकारात्मक उत्तरही दिलं जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये राज ठाकरेंची मनसे चौथा पक्ष म्हणून सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत "राज ठाकरे आमच्याच विचारधारेचे आहेत", असं म्हणून चर्चेला खतपाणीच घातल्याचं बोललं जात आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेतेमंडळींची मुंबईत रविवारी जाहीर सभा झाली त्यावर खोचक शब्दांत टीका केली. सगळ्यांचे चेहरे निराश दिसत होते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यावेळी मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता मुख्यमंत्री म्हणाले, "राज ठाकरे आमच्याच विचारधारेचे आहेत. त्यामुळे योग्य निर्णय होईल". मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचंच मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे सूचित केल्याचं आता बोललं जात आहे.