लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा महाराष्ट्रात आणि देशात सोमवारी पार पडतो आहे. यासाठीचा प्रचार थंडावला आहे. विरोधक आरोपांच्या फैरी झाडत आहेत आणि सत्ताधारी त्यांना प्रत्युत्तरं देत आहेत. महविकास आघाडीने राज्यात ३० ते ३५ जागा निवडून येतील असा दावा केला आहे. तर ही निवडणूक तुम्हाला कठीण वाटत असेल पण आमच्यासाठी आम्ही जसा अंदाज बांधला होता तशीच आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. “मोदी सरकार होय मी मुद्दाम मोदी सरकारच म्हणतो आहे कारण मला आता मोदी सरकार नको आहे तर भारत सरकार हवं आहे. मोदी सध्या राज्यभरात फिरत आहेत, एखाद्या गल्लीबोळात रोड शो देखील करतील, त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश कसा आहे हे मोदींनी अनुभवलं पाहिजे. मोदी सरकारच्या थापाही उघड झाल्या आहेत. मी भाषणांमधले मुद्दे यात मांडणार नाही पण हे सरकार म्हणजे गजनी सरकार झालं आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगायचा अधिकार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंविषयी काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?

“बाळासाहेब ठाकरेंबाबत मला खूप आदर आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही (भाजपा) करतो आहोत. आपल्या देशाच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे हे प्रभावी नेते ठरले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रहिताचं राजकारण कायमच केलं. लांगुलचालनाच्या राजकारणाचा त्यांनी विरोध केला. आता औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्यांसह आणि वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्याबरोबर उद्धव ठाकरेंनी आघाडी केली आहे. बाळासाहेबांना हे रुचलं असतं का? अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी करणाऱ्यांना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का? सत्तेपेक्षा बाळासाहेब ठाकरेंनी तत्त्व जपली. मात्र आत्ताच्या लोकांना सत्ताच सर्वकाही वाटते आहे. याबाबत अधिक काय बोलणार? ” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंना संपवून काश्मीर शांत होणार आहे का?”, ठाकरेंचा मोदींना थेट सवाल; म्हणाले “महाराष्ट्राच्या वाऱ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांविषयी काय म्हणाले मोदी?

याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबाबतही भाष्य केलं. मोदी म्हणाले, “शरद पवार हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या कुटुंबात जे काही घडलं त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. राष्ट्र प्रथम आणि विकासावर आधारित राजकारण ज्यांना करायचं आहे अशांचं एनडीएचे दरवाजे खुले आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एनडीएत आले कारण ते नकारात्मक राजकारणाला कंटाळले होते. आपला देश योग्य मार्गाने विकास करतो आहे हे त्यांना पटलं म्हणूनच ते आमच्याबरोबर आले. आता शरद पवार जे म्हणत आहेत की छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, यातून बारामतीच्या निवडणुकीचे काही संकेत त्यांना मिळाले आहेत का? राज्यात जो काही प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो पाहून त्यांना नैराश्य आलं आहे का?” असा प्रश्न नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.