महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज बारामतीत प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शरद पवारांसह रोहित पवारदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरचा एक प्रसंग सांगताना ते भावूक झाल्याचंही बघायला मिळालं. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “पक्ष फुटला त्यावेळी मी आणि काही पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसलो होते, त्यांच्याशी चर्चा करत होतो. ते टीव्हीकडे बघत होते. चेहऱ्यांवरचं दुख: ते दाखवत नव्हते. आम्ही त्यांना काही प्रश्न केले, त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. त्यानंतर ते खोलीच्या बाहेर जायला निघाले, त्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्याला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवायचा आहे. तो घडवत असताना आपल्याला नवीन पिढी तयार करायची आहे, जोपर्यंत ती नवी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही”, हा प्रसंग सांगताना रोहित पवार भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. “बारामतीतील जनता शरद पवारांच्या पाठिशी” ते पुढे बोलताना ते म्हणाले, “पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं ते त्यांनी पुन्हा कधीही करू नये, पवार साहेब हे आमचा जीव आहेत. विरोधकांनी त्यांना कितीही त्रास देण्याच प्रयत्न केला तरी ही बारामतीतील सामान्य जनता त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे.” “स्वार्थासाठी तर विचारांसाठी शरद पवार यांच्याबरोबर” “माझ्या आजोबांनी आणि वडीलांनी कष्टाने जी कंपनी उभी केली. त्यावर आज कारवाई करण्यात येत आहे. मी सत्तेत गेलो असतो तर ही कारवाई झाली नसती, याची मला कल्पना आहे. पण तरीही आम्ही शरद पवार यांच्याबरोबर राहिलो. कारण आम्ही स्वार्थासाठी नाही तर विचारांसाठी शरद पवार यांच्याबरोबर आहोत”, अशी प्रतिक्रियाही रोहित पवार यांनी दिली. अजित पवारांना लगावला टोला यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांनीही टोला लगावला. “आपल्या काही लोकांनी पक्षातून बाहेर पडताना पक्ष, चिन्ह आणि आपली जागा चोरून नेली. मात्र, त्यांनी कितीही जागा चोरायचा प्रयत्न केला, तरी शरद पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही”, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “या निवडणुकीत सुप्रिया सुळे या तीन ते साडेतीन लाख मतांनी निवडून येतील”, असे ते म्हणाले.