गौरव मुठे

भांडवली बाजाराच्या संबंधित दोन ऐतिहासिक घटना विद्यमान आठवड्यात घडल्या. त्या म्हणजे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलाने प्रथमच ४०० लाख कोटी बाजारभांडवलाचा टप्पा गाठला आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ७५,००० अंशांची ऐतिहासिक विक्रमी पातळी सर केली. त्यासंबंधाने शेअर बाजाराची वाटचाल कशी राहिली आणि भविष्य कशी असेल, याबाबत जाणून घेऊया.

सेन्सेक्सची वर्षभरातील कामगिरी कशी राहिली?

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने प्रथमच ७५,००० अंशांचा ऐतिहासिक टप्पा ओलंडत मंगळवारच्या सत्रात ७५,१२४ या विक्रमी शिखराला स्पर्श केला. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सने ७०,००० अंश ते विक्रमी ७५,००० अंशांची पातळी गाठली. तर गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्सने १०,००० अंशांची कमाई केली. मार्च तिमाहीतील कंपन्यांची मजबूत आर्थिक कामगिरी आणि निवडणूकपूर्व तेजीमुळे बाजाराचा वेग असाच कायम राहण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४०० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले. विशेष म्हणजे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या १.३३ पट आकाराच्या समतुल्य आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत १०० लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

आणखी वाचा-‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?

सेन्सेक्सचा आजवरचा प्रवास कसा?

मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल सप्टेंबर २००७ मध्ये पहिल्यांदा ५० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्यांनतर मार्च २०१४ मध्ये प्रथमच १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. त्यानंतर २०० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी ७ वर्षे लागली आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये तो टप्पा गाठला. जुलै २०२३ मध्ये बाजार भांडवल ३०० लाख कोटी होते, तेथून पुढे अवघ्या ९ महिन्यांत ते ४०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सेन्सेक्स १५ टक्के वधारला. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ४० टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक संस्थांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांतील वाढलेल्या मूल्याकंनाबाबत चिंता व्यक्त केली. मात्र हा सौम्य धक्का पचवल्यानंतर, त्यांनी गेल्या आठवड्यात जोरदार पुनरावृत्ती केली.

शाश्वत वाढीस कारणीभूत घटक कोणते?

गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत गृहनिर्माण क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, वाहन निर्मिती, ऊर्जा आणि औषधी निर्माण या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. भांडवली बाजाराला उच्चांकी पातळीवर पोहोचवण्यास सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर अचानक प्रकाशझोत आला, त्यांच्या समभागांनी कमावलेल्या बहुप्रसवा मोलाने एकंदर भांडवली बाजाराला दिशा देण्यात भूमिका बजावली. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७५ हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. सरकारी धोरणे आणि ‘मोदी की गॅरंटी’ यांच्याशी संबंधित गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित पीएसयू निर्देशांक आणि पीएसयू बँक निर्देशांक एका वर्षात जवळपास दुप्पट झाले आहेत.

आणखी वाचा-विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?

परदेशी गुंतवणूकदारांचे योगदान किती?

जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था वेगाने मार्गक्रमण करत आहे. या आशावादाने प्रेरित होऊन परदेशी गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशांतर्गत भांडवली बाजारामध्ये २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजने दिलेल्या माहितीनुसार, जून आणि जुलै २०२३ या दोन महिन्यांच्या कालावधीत परदेशी गुंतवणूकदारांनी अनुक्रमे ४७,१४८ कोटी आणि ४६,६१८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर ऑगस्ट २०२३ मध्ये १२,२६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पुढे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या दोन महिन्यात मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी अनुक्रमे १४,७६८ कोटी आणि २४,५५८ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा त्यांनी ६६,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जानेवारी २०२४ मध्ये २५,७४४ कोटी रुपयांचे निर्गमन झाल्यानंतर फेब्रुवारी २०२४ पासून परदेशी गुंतवणूकदार पुन्हा सरसावले आहेत. अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्देशक, वाढती देशांतर्गत गुंतवणूक आणि राजकीय स्थिरतेची पार्श्वभूमीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा देशांतर्गत भांडवली बाजारावरील विश्वास वाढला आहे.

डिमॅट खाती आणि आयपीओंचा सहभाग कसा?

देशांतर्गत भांडवली बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदारांसह किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षात पडलेली सर्वात मोठी वाढ आहे. परिणामी मार्च २०२४ पर्यंत डिमॅट खात्यांची संख्या १५ कोटींच्या पुढे गेली आहेत. सरासरी दर महिन्याला ३० लाख नवीन डिमॅट खाती उघडली जात आहेत. दुसरीकडे प्राथमिक बाजारात देखील उत्साहाचे वातावरण असून २४ कंपन्यांची प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ६७,५०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

आणखी वाचा-“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

बाजाराची आगामी चाल कशी राहील?

भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांच्या विकासवेगासह आशिया खंडातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था आहे. त्याचे पडसाद भांडवली बाजारातील कंपन्यांवर उमटले आहे. सरलेल्या मार्च तिमाहीतमध्ये कंपन्यांच्या महसुलात ६ ते ८ टक्के सरासरी वाढ होण्याचा अंदाज मोतीलाल ओसवाल या दलाली पेढीने व्यक्त केला आहे. तर एचएसबीसी रिसर्चने २०२४ साठी १७.८ टक्के महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. बँकिंग, आरोग्यसेवा आणि ऊर्जा यांसारखी क्षेत्रे वाढीसाठी चांगल्या स्थितीत आहेत, तरी काही क्षेत्रांना मात्र आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकपयोगी कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेतील कंपन्यांनी खर्च कमी केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही एचडीएफसी इन्स्टिट्यूशनल रिचर्सने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या महसुलात २.६ टक्के वाढीचा विश्वास व्यक्त केला आहे. इतर दलाली पेढ्यांनी मात्र टीसीएस आणि इन्फोसिसचा महसूल २ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जागतिक पातळीवरील, विशेषत: अमेरिकी मध्यवर्ती बँकेची व्याजदराबाबत भूमिका बाजारातील अस्थिरतेवर परिणाम करू शकते. परिणामी भांडवली बाजार विश्लेषक क्षेत्र आणि समभाग केंद्रित निवडक कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याचा सल्ला देतात. शिवाय व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप कंपन्यांमधील अल्प तेजीच्या मोहात पडू नका असा मोलाचा सल्ला देत आहेत.

निवडणूक निकाल

४ जून २०२४ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होईपर्यंत, भारतीय भांडवली बाजार एका व्यापक श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या विद्यमान सरकारसाठी अनुकूल निकालाची अपेक्षा आहे. निवडणूक निकाल, अंतिम केंद्रीय अर्थसंकल्प, जगभरातील मध्यवर्ती बँकांचे व्याजदर कपातीबाबत धोरण आणि कंपन्यांची तिमाहीत कामगिरी यांच्या आधारे निवडणुकीनंतरच्या बाजारातील लक्षणीय हालचाली अपेक्षित आहेत, असे मत अल्फा कॅपिटलचे कुणाल जैन यांनी व्यक्त केले.

gaurav.muthe@expressindia.com