ज्ञानेश भुरे
नियमात बदल किंवा नव्या नियमांचा शोध, त्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर हे आता ‘आयपीएल’साठी नित्याचे झाले आहे. या वेळी असेच काही नियम करण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा नियमबदल म्हणजे एका षटकात दोन बाउन्सर किंवा उसळते चेंडू टाकण्याची मुभा. त्यामुळे फलंदाजांना तंत्रात बदल करावा लागेल. या आणि अन्य नियमांचा खेळावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या हंगामात कोणते नवे नियम?

गेल्या वर्षी ‘आयपीएल’ने ‘इम्पॅक्ट प्लेअर’, नाणेफेकीनंतर संघ घोषित करणे, वाईड आणि नो बॉलसाठी ‘रीव्ह्यू’ वापरण्यास मुभा असे नियम सुरू केले. आता या वर्षी दोन उसळते चेंडू, ‘स्मार्ट रीप्ले’, यष्टिचीतपूर्वी झेलबाद असल्याची पडताळणी असे नवे नियम ‘बीसीसीआय’ने आणले आहेत.

एका षटकात दोन बाउन्सर…

आतापर्यंत ‘आयपीएल’मध्ये गोलंदाजांना एका षटकात एकच उसळता चेंडू टाकण्याची परवानगी होती. मात्र, यंदाच्या हंगामात ‘बीसीसीआय’ने गोलंदाजांना एका षटकात दोन उसळते चेंडू टाकण्याची मुभा दिली आहे. अर्थात, ‘आयसीसी’च्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन उसळणारे चेंडू टाकण्याची परवानगी आहे. ‘बीसीसीआय’ने गेल्या वर्षीपासून देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून हा नियम वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी यात समतोल साधण्यात मदत होईल अशी ‘बीसीसीआय’ला आशा आहे.

आणखी वाचा- विश्लेषण : यशस्वी, विराट, शुभमन, कमिन्स, कुलदीप… आयपीएलमध्ये यंदा कोण ठरेल लक्षवेधी?

बाउन्सर नियमाचा किती प्रभाव पडणार?

उसळते चेंडू टाकायला मिळणे ही गोलंदाजांला समाधान देणारी गोष्ट असते. गोलंदाज अशा चेंडूंचा वापर आपले हुकमी किंवा हक्काचे अस्त्र म्हणून करतात. परदेशी फलंदाजांना असे चेंडू खेळण्याची सवय असते. त्यामुळे खरी कसोटी ही भारतीय फलंदाजांची लागणार आहे. ‘आयपीएल’मध्ये खेळणारे परदेशी गोलंदाज अशा चेंडूंचा वापर भारतीय, त्यातही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या फलंदाजांविरुद्ध अधिक करतील. थोडक्यात गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांमधील सामना या नियमामुळे रंजक होणार आहे.

या नियमाचा कसा उपयोग केला जाऊ शकेल?

दोन उसळत्या चेंडूंचा नियम हा दुधारी अस्त्र ठरणार आहे. ज्याला उसळते चेंडू खेळण्याची सवय आहे, त्यांना याचा फरक पडणार नाही. त्यामुळे अस्त्र असले, तरी गोलंदाजांना फलंदाज पाहूनच अशा चेंडूंचा वापर करावा लागेल. गोलंदाज आणि प्रशिक्षकांना आपली रणनीती ठरविण्यासाठी या नियमाचा फायदा होऊ शकतो. प्रत्येकासाठी नाही, तर विशिष्ट फलंदाजासाठी या चेंडूचा वापर केला जाऊ शकेल. अखेरच्या षटकांत या चेंडूचा उपयोग अधिक प्रभावी ठरू शकतो.

आणखी वाचा- विश्लेषण : मुंबई, चेन्नई सहाव्यांदा, की बंगळूरु पहिल्यांदा… आयपीएलमध्ये यंदा कोणाची सरशी?

‘आयपीएल’मध्ये यंदाही दोन ‘रीव्ह्यू’?

यंदाही दोन ‘रीव्ह्यू’चा नियम कायम आहे. वाईड आणि नो-बॉल पडताळणीसाठी ‘रीव्ह्यू’ घेण्याची परवानगी असेल. यष्टिचीत अपील केले असले, तरी त्यापूर्वी झेल न तपासणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेत ‘बीसीसीआय’ने यष्टिचितचा निर्णय घेण्यापूर्वी झेल आहे का, हे तपासण्यास मान्यता दिली आहे. ‘आयसीसी’च्या नियमानुसार, अपील यष्टिचीतचे असेल, तर तिसरा पंच फक्त आणि फक्त यष्टिचीतचाच निर्णय डोळ्यासमोर ठेवतो.

‘स्टॉप वॉच’चा वापर नाही?

दोन चेंडू किंवा दोन षटकांदरम्यान गोलंदाजही रेंगाळू लागले आहेत. याच्यावर वचक रहावा म्हणून ‘आयसीसी’ने ‘स्टॉप वॉच’ (वेळकाढू गोलंदाजीला दंड) या नियमाच्या वापरास मान्यता दिली आहे. ‘आयपीएल’मध्ये मात्र हा नियम बाजूला ठेवण्यात आला आहे. सामना वेळेत संपण्यासाठी हा नियम खूप महत्त्वाचा आहे. या नियमाची पडताळणी करूनच तो प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, ‘आयपीएल’मध्ये हा नियम वापरण्यात येणार नाही.

‘स्मार्ट रीप्ले’ प्रणाली काय आहे?

यंदाच्या स्पर्धेत ‘स्मार्ट रीप्ले’ या नव्या प्रणालीचाही अवलंब केला जाणार आहे. यानुसार, ‘हॉक आय’ प्रणालीचे तज्ज्ञ तिसऱ्या पंचांसोबतच बसणार आहेत. यामुळे निर्णय अधिक वेगवान आणि अचूक पद्धतीने घेतले जाणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bowlers are allowed to bowl two bouncers in an over batting more challenging in this year ipl what is other rule changes print exp mrj
First published on: 22-03-2024 at 09:31 IST