संदीप कदम
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाला आता काहीच दिवसांत सुरुवात होणार आहे. अनेक खेळाडू यामध्ये आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. पण, काही खेळाडूंवर या लीगमध्ये विशेष लक्ष राहील. ‘आयपीएल’ नंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून चांगला सरावही करता येणार आहे. ते खेळाडू कोणते याबाबत जाणून घेऊ या…

शुभमन गिल (गुजरात टायटन्स)

भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेला युवा सलामीवीर शुभमन गिल या ‘आयपीएल’ हंगामात दुहेरी भूमिकेत पाहायला मिळेल. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाकडे आल्यानंतर गिलवर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व करताना आपल्या फलंदाजीनेही त्याला चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. गिलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ४५२ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपल्या ४४ सामन्यांत २२७१ धावा केल्या आहेत. ‘आयपीएल’मधील गिलची कामगिरीही चांगली आहे. त्याने २०१८मध्ये लीग खेळण्यास सुरुवात केल्यानंतर ९१ सामन्यांत २७९० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. गेल्या हंगामात गिलने १७ सामन्यांत ८९० धावा करीत सर्वांचे लक्ष वेधले. तर, २०२२च्या हंगामातही त्याने ४८३ धावा केल्या आहेत. त्यामुळे या हंगामातही आपली हीच लय कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न राहील.

यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स)

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीने खोऱ्याने धावा केल्या. त्याने पाच सामन्यांत ७१२ धावा करीत सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला. या मालिकेत त्याने दोन सलग द्विशतके झळकावली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १७ ट्वेन्टी-२० सामन्यांत ५०२ धावा केल्या आहेत. यशस्वी राजस्थान रॉयल्सकडून ‘आयपीएल’मध्ये खेळतो. त्याची लय पाहता यंदाच्या त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहील. यशस्वीने २०२०मध्ये ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. त्यानंतर खेळलेल्या ३७ सामन्यांत त्याने ११७२ धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात यशस्वीने १४ सामन्यांत ६२५ धावा केल्या. त्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. राजस्थानला ‘प्ले-ऑफ’ पर्यंत मजल मारायची झाल्यास यशस्वीची कामगिरी निर्णायक असेल.

आणखी वाचा- विश्लेषण : मुंबई, चेन्नई, गुजरात, बंगळूरु, दिल्ली… ‘आयपीएल’मध्ये या संघांच्या कामगिरीकडे लक्ष!

विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु)

भारताचा तारांकित क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली ओळखला जातो. वैयक्तिक कारण पुढे करीत विराटने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, त्याला नंतर मुलगा झाल्याची बातमी सर्वांना कळाली. आता तो ‘आयपीएल’साठी सज्ज झाला आहे. बराच काळ मैदानाबाहेर राहिल्याने विराटच्या स्पर्धेतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. संघाला यंदा जेतेपद मिळवून द्यायचे झाल्यास विराट चांगल्या लयीत असणे गरजेचे आहे. गेल्या हंगामात कोहलीने १४ सामन्यांत ६३९ धावा केल्या होत्या व त्याने शतकही झळकावले होते. यंदाही संघाला त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. ‘आयपीएल’मध्ये विराटचा अनुभव दांडगा आहे. त्याने २३७ सामन्यांत ७२६३ धावा केल्या आहेत.

मिचेल स्टार्क (कोलकाता नाइट रायडर्स)

हंगामासाठी झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने २४ कोटी ७५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. स्टार्कने २०१४मध्ये ‘आयपीएल’ पदार्पण केले होते. मात्र, दोन हंगाम खेळल्यानंतर तो लीगमध्ये खेळला नाही. त्याने आपल्या अखेरच्या सत्रात १३ सामन्यांत २० गडी बाद केले होते. यंदाही तो कोलकातासाठी निर्णायक भूमिका पार पाडेल, अशी अपेक्षा असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून स्टार्ककडे पाहिले जाते. त्यामुळे इतक्या वर्षांनी पुनरागमन करताना स्टार्क कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल.

पॅट कमिन्स (सनरायजर्स हैदराबाद)

ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या पॅट कमिन्सला लिलावात सनरायजर्स हैदराबाद संघाने २० कोटी ५० लाख रुपयांना घेतले. कमिन्स गेल्या सत्रात सहभागी झाला नव्हता. २०२२च्या सत्रात खेळलेल्या पाच सामन्यांत त्याने सात गडी बाद केले होते. हैदराबाद संघ सध्या अनेक अडचणींचा सामना करताना दिसत आहे. त्यामुळे कमिन्सची या हंगामातील भूमिका ही निर्णायक असेल. त्यातच लिलावात दुसरा सर्वात महागडा खेळाडू असल्याने त्याच्याकडून संघाला अपेक्षाही असतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमिन्स चांगल्या लयीत आहे व त्याचा फायदाही संघाला होईल.

आणखी वाचा- आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर अखेर या हंगामात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागमन झाले. जवळपास वर्षाहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिलेल्या पंतकडे यावेळी सर्वांचे विशेष लक्ष राहील. तसेच, त्याला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. अपघात होण्यापूर्वी ऋषभ पंतने भारताच्या विजयात अनेक निर्णायक खेळी केल्या होत्या. २०२२च्या हंगामात पंतने १४ सामन्यांत ३४० धावा केल्या होत्या. अपघातात होऊनही दिल्लीच्या व्यवस्थापनाने त्याच्यावरचा विश्वास ठेवत संघात कायम ठेवले. त्यामुळे या हंगामातही त्याच्याकडून संघ व्यवस्थापनाला अपेक्षा असतील. तो सर्वांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतो हे पहावे लागेल.

कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या चांगल्या लयीत आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत कुलदीपने चमकदार कामगिरी करताना चार सामन्यांत १९ बळी मिळवले. ‘आयपीएल’च्या गेल्या दोन हंगामातही कुलदीपने आपली छाप पाडली होती. गेल्या हंगामात त्याने १४ सामन्यांत १० गडी बाद केले. तर, २०२२च्या हंगामात २१ बळी मिळवण्याची किमया त्याने साधली. भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहता कुलदीप त्याच्या संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. त्यातच आपल्या वेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यास सक्षम आहे.

रिंकू सिंह (कोलकाता नाइट रायडर्स)

आपल्या छोट्या मात्र, निर्णायक खेळींनी सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या रिंकू सिंहकडून यावेळी संघाच्या अपेक्षा वाढल्या आहे. गेल्या हंगामातील खेळींच्या बळावर रिंकूने भारताच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवले. राष्ट्रीय संघातही त्याने काही निर्णायक खेळी करताना संघाला विजय मिळवून दिले. त्याने १५ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. गेल्या हंगामात रिंकूने १४ सामन्यांत ४७४ धावा करीत कोलकाता संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्याने यादरम्यान चार अर्धशतके झळकावली. चांगल्या लयीत असलेल्या रिंकूकडून संघ व्यवस्थापनाला या हंगामातही चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.