भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे लक्ष असले तरी चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान काय चुका झाल्या होत्या? यानाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी संपर्क का तुटला होता? यावर नजर टाकू या…

७ सप्टेंबर २०१९ रोजी या यानाशी असलेला संपर्क तुटला

चांद्रयान-२ या मोहिमेत अंशत: यश आल्यानंतर तब्बल चार वर्षांनी भारताची चांद्रयान-३ मोहीम प्रत्यक्षात उतरणार आहे. २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान-२ मोहिमेंतर्गत विक्रम नावाचे लँडर आणि प्रज्ञान नावाचे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने ७ सप्टेंबर २०१९ रोजी या यानाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी असलेला संपर्क तुटला होता.

Akshaya Tritiya, gold, price,
अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर
3 indians killed in road accident in canada
कॅनडामध्ये अपघातात तीन भारतीयांचा मृत्यू
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…

‘विक्रम’च्या लँडिंगदरम्यान त्या दिवशी नेमके काय घडले होते?

‘विक्रम’ लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या ३३५ मीटर (०.३५ किमी) अंतरावर असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. ‘इस्रो’च्या टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड सेंटर या विभागाने सांगितल्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ५ किमी ते ४०० मीटर असतानाच विक्रम लँडरमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाली होती. हा बिघाड उड्डाणाच्या ‘फाईन ब्रेकिंग फेज’ या शेवटच्या टप्प्यात झाला होता. ‘इस्रो’च्या कार्यालयातून चांद्रयान-२ मोहिमेवर नियंत्रण ठेवले जात होते. कार्यालयात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवरही असा बिघाड आलेखाच्या माध्यमातून दिसून येतो. विक्रम लँडर चंद्रापासून दोन किलोमीटर अंतरावर असताना त्याने दिशा बदलायला सुरुवात केली. पुढे चंद्रापासून १ किमी ते ५०० मीटर अंतरावर असेपर्यंत ‘विक्रम’ आपली दिशा बदलत राहिला.

लँडरची गती कमी होणे अपेक्षित होते; पण…

चंद्राच्या पृष्ठभागापासून एक किमी ते ५०० मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती अपेक्षेपेक्षा जास्त होती. लँडर ५९ मीटर प्रतिसेकंद म्हणजेच साधारण २१२ किमी प्रतितास उभ्या गतीने (Vertical Velocity) आणि ४८.१ मीटर प्रतिसेकंद म्हणजेच १७३ किमी प्रतितास आडव्या गतीने (Horizontal Velocity) चंद्राच्या पृष्ठभागाावर जात होते. ठरवलेल्या योजनेनुसार चंद्राच्या पृष्ठभागाच्या ४०० मीटर अंतरावर असताना विक्रम लँडरची गती कमी होणे अपेक्षित होते. तसेच निश्चित केलेल्या ठिकाणी या लँडरने फेऱ्या मारायला हव्या होत्या. त्यानंतर सामान्य माणूस ज्या गतीने चालतो, त्या गतीने लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायला हवे होते. मात्र, लँडरची गती अपेक्षेपेक्षा जास्त होती. त्यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर न उतरता थेट कोसळले. त्यानंतर लँडरचा ‘इस्रो’शी असलेला संपर्क तुटला.

चांद्रयान-२ मोहिमेतील लँडर चंद्रावर का उतरू शकले नाही? नेमकं काय चुकलं?

‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान झालेल्या चुकांची १० जून रोजी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार- तीन चुकांमुळे चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरू शकले नाही.

इंजिन्सनी अपेक्षेपेक्षा जास्त दाब निर्माण केला अन्…

“चांद्रयान-२ मोहिमेत लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता. या इंजिनांच्या मदतीने लँडरचा वेग कमी करण्यात येणार होता. विज्ञानाच्या भाषेत त्याला ‘रिटार्डेशन’ म्हणतात. मात्र, या इंजिनांनी अपेक्षेपेक्षा जास्त दाब, जोर (Thrust) निर्माण केला. या दाबामुळे लँडरमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे ‘कॅमेरा कोस्टिंग फेज’दरम्यान लँडरची स्थिरता कायम राहू शकली नाही. परिणामी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले

लँडर घेऊ लागले अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वळण

दुसरे कारण म्हणजे चांद्रयान-२ मोहिमेदरम्यान लँडरची गती प्रमाणापेक्षा जास्त राहिल्यामुळे आम्हाला अपेक्षित असलेल्या अडचणींपेक्षा प्रत्यक्षात जास्त तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. लँडर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वळण घेऊ लागले. हा वेग नंतर वाढतच गेला. मात्र, आम्ही एका सॉफ्टवेअरच्या मदतीने या वळणांच्या गतीला मर्यादा घालून दिली होती. लँडरची वळण घेण्याची गती एवढ्या प्रमाणात वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, असे सोमनाथ यांनी सांगितले.

चंद्राचा पृष्ठभाग जवळ असताना लँडरने वाढवला वेग

तसेच चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी ठरण्याचे तिसरे कारण म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग जवळ असताना तो लँडरला लांब आहे, असे वाटले. परिणामी लँडरने त्याचा वेग कमी करण्याऐवजी वाढवला. ५०० बाय ५०० मीटरच्या परिसरात उतरायचे असल्यामुळे लँडरला हा ताळमेळ साधता आला नाही. याच कारणामुळे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले, असे सोमनाथ यांनी सांगितले.

१४ जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार

दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेमध्ये झालेल्या चुका सुधारून ‘इस्रो’ने आता चांद्रयान-३ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत १४ जुलै रोजी अंतराळयान चंद्राकडे झेपावणार आहे. त्यामुळे भारताच्या या मोहिमेकडे भारतीयांचे, तसेच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.