भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे. पण राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय हे जाणून घेऊया.

“..तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?

जगातील जवळजवळ प्रत्येक देशात राष्ट्रीय दुखवटा स्वतःच्या पद्धतीने पाळला जातो. तो पाळण्याचे कारण आणि प्रक्रिया कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे, पण आपण भारताबद्दल जाणून घेऊया.

भारतातील ‘राष्ट्रीय दुखवटा’ हा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. हा ‘राष्ट्रीय दुखवटा’ एखाद्या ‘व्यक्तीच्या’ निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाळला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार, राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी, संपूर्ण भारतात आणि परदेशातील भारतीय संस्थांमध्ये (जसे की दूतावास इ.) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाही आणि कोणतेही अधिकृत काम केले जात नाही.  मेळावे आणि अधिकृत मनोरंजनावर देखील बंदी असते. निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात.

…जेव्हा १९८३ विश्वचषक विजेत्या संघासाठी लतादीदींनी गाणं गात जमा केले होते पैसे; जाणून घ्या काय घडलं होतं?

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर सात दिवस दूरदर्शनवर केवळ ‘अखिल भारतीय नृत्य कार्यक्रम’, ‘संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम’ आणि बातम्या दाखवण्यात आल्या. बातमी येण्याआधी वाजणारे संगीतही बंद करण्यात आले होते.

याआधी केवळ विद्यमान आणि माजी पंतप्रधान, विद्यमान आणि माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान आणि माजी राज्यमंत्री अशा लोकांचीच अंत्यसंस्कारावेळी उपस्थिती असायची. पण कालांतराने नियम बदलले. आता पूर्ण राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करणार हे राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

राजकीय, साहित्य, कायदा, विज्ञान आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रातील मृत्यू झालेल्या व्यक्तीला राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. निर्णय झाल्यानंतर तो उपायुक्त, पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवला जातो. जेणेकरून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करता येईल.

शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करताना मृतदेह तिरंग्यात गुंडाळला जातो. निधन झालेल्या व्यक्तीला संपूर्ण लष्करी सन्मान दिला जातो. यानंतर लष्करी बँडद्वारे आणि बंदुकीद्वारे सलामी दिली जाते.

कधी जाहीर करण्यात आला राष्ट्रीय दुखवटा?

२०१३ – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.

२०१८ –  द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१८ – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०१९ – गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

२०२० – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained central government declares two days of national mourning as mark of respect to lata mangeshkar abn
First published on: 06-02-2022 at 12:52 IST