देशातील पहिली खासगी ट्रेन १५ जूनपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. भारत गौरव योजनेंतर्गत सुरू झालेल्या या ट्रेनला कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही गाडी गुरुवारी शिर्डीतील साई नगरात पोहोचली. दक्षिण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बी गुग्नेसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डब्यांच्या या विशेष ट्रेनमध्ये १५०० प्रवासी प्रवास करू शकतात. या ट्रेनची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे भाडे देखील भारतीय रेल्वेच्या तिकिटांच्या किमतीएवढे आहे. 'भारत गौरव' योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी ट्रेन सुरू झाली आहे. त्याचा पहिला प्रवास तामिळनाडूतील कोईम्बतूर ते शिर्डी ते साई नगर असा होता. भारतीय रेल्वेने ही ट्रेन एका खाजगी सेवा प्रदात्याला दोन वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. यामध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड क्लास एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत. 'भारत गौरव' योजना काय आहे? गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टुरिस्ट सर्किट ट्रेन्स भारत गौरव ट्रेनची घोषणा केली होती. भारतातील ऐतिहासिक ठिकाणे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा रेल्वेने जोडणे हे त्याचे ध्येय आहे. जेणेकरून देशातील आणि जगातील लोक या ठिकाणी सहज पोहोचू शकतील. या योजनेअंतर्गत, सेवा प्रदाता प्रवाशांना रेल्वे प्रवास, निवास, भोजन, प्रेक्षणीय स्थळे इत्यादींचे सर्वसमावेशक पॅकेज ऑफर करणार आहे. पहिली भारत गौरव ट्रेन कोण चालवत आहे? कोईम्बतूर ते शिर्डी ही भारत गौरव ट्रेन चालवणारी साउथ स्टार रेल ही नोंदणीकृत सेवा प्रदाता आहे. कोईम्बतूर स्थित ही संस्था फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड समूहाचा भाग आहे. २० डब्यांच्या रचना असलेल्या या ट्रेनसाठी सेवा प्रदात्याने दक्षिण रेल्वेला डिपॉजिट म्हणून १ कोटी रुपये दिले आहेत. “याशिवाय, कंपनीने वार्षिक राईट टू यूज चार्जेससाठी २७.७९ लाख आणि ७६.७७ लाख त्रैमासिक फिक्स्ड होलेज चार्जेस दिले आहेत. या व्यतिरिक्त, सध्याच्या राउंड ट्रिपसाठी ३८.२२ लाखाचे शुल्क देखील जमा केले आहे. हे सर्व शुल्क जीएसटी वगळून आहेत,” असे मंत्रालयाने सांगितले. १५०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील 'भारत गौरव' योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी ट्रेन सुरू करणारा दक्षिण रेल्वे हा पहिला विभाग ठरला आहे. पहिल्या प्रवासाला १४ जून रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. तामिळनाडूतील कोईम्बतूर ते साईनगर शिर्डी अशी पहिली सेवा सुरू झाली. या रेल्वेच्या दर महिन्याला किमान तीन फेऱ्या होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा मिळतात ? योजनेंतर्गत गाड्यांना एक फर्स्ट एसी कोच, तीन २ टायर एसी कोच आणि आठ ३-टायर कोच आणि पाच स्लीपर क्लास कोच आहेत. रेल्वे पोलीस दलासह खाजगी सुरक्षेसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी ट्रेनमध्ये एक डॉक्टर देखील असेल. ट्रेनमध्ये प्रवाशांना उत्कृष्ट सेवा मिळणार आहे. यामध्ये उच्च दर्जाचे शाकाहारी भोजन, स्नॅक ट्रॉली, भक्तीविषयक मासिके, स्लीपिंग किट मिळेल. वृद्ध आणि अपंगांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी विशेष मदत केली जाईल. “नोंदणीकृत सेवा प्रदात्याने डब्यांच्या आतील भागांचे नूतनीकरण केले आहे आणि प्रवाशांना आरोग्यदायी अनुभव देण्यासाठी सर्व डब्यांमध्ये चोवीस तास सफाई कर्मचारी असणार आहेत,” असे मंत्रालयाने सांगितले. "कोइम्बतूर ते शिर्डी आणि परत जाण्यासाठी वाहतूक, व्हीआयपी दर्शन, बस व्यवस्था, वातानुकूलित निवास, टूर गाईडद्वारे सुविधा यांचा समावेश असलेले पॅकेज भाडे देखील देते," असे मंत्रालयाने सांगितले. कोईम्बतूर येथून पुढील प्रवासादरम्यान, ही ट्रेन मंत्रालयम रोड स्टेशनवर पाच तास थांबते जेणेकरून लोकांना मंत्रालयम मंदिराला भेट देता येईल.राजधानी आणि प्रिमियम गाड्यांप्रमाणे या गाड्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे. जेणेकरून या गाड्या रोखल्या जाणार नाहीत किंवा बाजूला ठेवल्या काढल्या नाहीत.