अनुभवी टेक कंपनी गुगल आणि भारतीय दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेल यांनी धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हातमिळवणी केली आहे. गुगलने भारती एअरटेलमध्ये १ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आणि तो दोन टक्क्यांहून अधिक वाढला. गुगल ही गुंतवणूक गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडाचा भाग म्हणून करत आहे.
भारतात गुगलची याआधीची गुंतवणूक कोणती होती?
एअरटेलमधील गुंतवणुकीव्यतिरिक्त, गुगलने दूरसंचार कंपनीच्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओमध्ये ४.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच गुगलने आपल्या एक्सीलरेटर प्रोग्रामद्वारे भारतातील डझनहून अधिक स्टार्टअप्सला पाठिंबा दिला आहे.
एअरटेलसोबतच्या डीलमध्ये काय?
गुगलने सांगितले की, गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडाचा भाग म्हणून १ अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे, ज्यामध्ये इक्विटी गुंतवणूक तसेच संभाव्य व्यावसायिक करारांसाठी निधीचा समावेश आहे. यामध्ये गुगल १ अब्ज डॉलरपैकी ७० कोटी डॉलरद्वारे भारती एअरटेलमधील १.२८ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. भारती एअरटेलने स्पष्ट केले आहे की, गुगल कंपनीतील हा स्टेक ७३४ रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करेल. गुगल परवडणारे फोन विकसित करण्यासाठी भारती एअरटेलसोबत काम करेल आणि ७० कोटी डॉलरद्वारे ५जी तंत्रज्ञानावर संशोधन करेल.
या व्यावसायिक करारांमध्ये काय समाविष्ट आहे?
एका निवेदनानुसार, त्याच्या पहिल्या व्यावसायिक कराराचा एक भाग म्हणून, एअरटेल आणि गुगल नाविन्यपूर्ण परवडण्याजोग्या कार्यक्रमांद्वारे ग्राहकांना अँड्रॉइड फोनची उपलब्ध करुन देण्याचे काम करेल. दोन्ही कंपन्या विविध उपकरण निर्मात्यांसोबत भागीदारी करून स्मार्टफोनच्या मालकीतील अडथळे दूर करण्यासाठी काम करतील. उल्लेखनीय म्हणजे, जिओने गेल्या वर्षी गुगलसोबत भागीदारी करून परवडणारे ४जी डिव्हाइस लॉन्च केले होते.
गुगल एअरटेल कराराचा फायदा ३० कोटी वापरकर्त्यांना होणार आहे जे अद्याप फीचर फोन वापरत आहेत. तज्ञांनी म्हटले आहे की, गुगल करारामुळे एअरटेलला नवीन सर्व्हिस असणारे कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर असणारे स्मार्टफोन आणण्याची परवानगी देईल. हे फीचर फोन्सवरून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यात कंपनीला मदत करेल. एअरटेलला ही परवडणारी सुविधा आणण्यासाठी त्यांच्या हार्डवेअर पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागेल.
एअरटेलला आणावे लागणार स्वस्त स्मार्टफोन
सीएमआरचे इंडस्ट्री इंटेलिजन्स ग्रुप हेड प्रभु राम यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” भारतातल्या पहिल्यांचा डिजिटल युगात पाऊल ठेवणाऱ्या ग्राहकांना डिजिटल मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी परवडणारे स्मार्टफोन महत्त्वाचे आहेत. यावेळी एअरटेला भारताच्या अनोख्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी गुगलकडून सॉफ्टवेअरची मदत होणार आहे.” एअरटेलला गुगलच्या सॉफ्टवेअर कौशल्याचा फायदा मिळावा हे एअरटेल त्यांच्या हार्डवेअर भागीदारांसोबत कसे काम करते यावर अवलंबून असणार आहे, असेही राम म्हणाले.
३० कोटी युजर्संना आकर्षित करण्याचे लक्ष्य
काउंटरपॉइंटच्या अंदाजानुसार, भारतातील फीचर फोन वापरकर्त्यांची संख्या सुमारे ३० कोटी आहे. बंडल ऑफरिंगच्या मदतीने या फीचर फोन वापरकर्त्यांना त्यांच्या ४जी नेटवर्क आणि स्मार्टफोन्सकडे आकर्षित करण्याचे तीन टेलिकॉम ऑपरेटरचे लक्ष्य आहे. भारती एअरटेल सोबतच्या भागीदारीसह, गुगलने एका ब्लॉगस्पॉटमध्ये म्हटले आहे की भारतातील Android OEM इकोसिस्टम वाढवण्यात मदत करण्यासाठी नवीन आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल तयार करण्याची योजना आहे.