प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ पुढील महिन्यात येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी अद्यापही प्रयोग करताना आढळत आहे. भारताचा ९० ते ९५ टक्के संघ निश्चित झाला आहे. फक्त काही प्रश्न अनुत्तरित असल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. पण आशिया चषकातील पराभवांमुळे आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने भारताच्या प्रयोगांवर आणि संघ निवडीवर जोरदार टीका होत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीचा अंतिम संघ आजमावणार कधी, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाच्या काही अनुत्तरित प्रश्नांचा घेतलेला वेध.

आघाडीच्या फळीकडून सातत्याचा अभाव…

उपकर्णधार केएल राहुल (६,२८, ३६, ०, ६२), कर्णधार रोहित शर्मा (१२, २१, २८, ७८) आणि विराट कोहली (३५, ५९*, ६०, ०, बिनमहत्त्वाच्या सामन्यात नाबाद १२२) हे भारताचे पहिले तीन फलंदाज. परंतु आशिया चषकातील सामन्यांत आघाडीच्या फळीकडून सातत्याचा अभाव जाणवला. राहुल आणि रोहित यांची सलामीची जोडीसुद्धा बहरताना आढळली नाही. राहुलचा ९५.८९ हा स्ट्राइक रेट चिंताजनक आहे. हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सलग अर्धशतके झळकावून कोहलीला अपेक्षित सूर गवसला असे वाटत असतानाच श्रीलंकेविरुद्धा तो भोपळाही फोडू शकला नाही. सलामीला उतरत आयर्लंडविरुद्ध सातत्यपूर्ण खेळी करणारा दीपक हुडा संघात असूनही मधल्या फळीत उतरत आहे. इशान किशनला संघात स्थानच देण्यात आलेले नाही. त्यामुळे आघाडीच्या फळीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

विश्लेषण: पावसाचा स्वभाव बदलला काय? काय कारणे आहेत?

गोलंदाजीची फळी कमकुवत..

जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि दीपक चहर हे भारताचे तीन अव्वल वेगवान गोलंदाज आहेत. यापैकी चहरला राखीव गोलंदाज म्हणून नेण्यात आले. परंतु आशिया चषकासाठी संघनिवड करताना तंदुरुस्तीमुळे बुमरा आणि हर्षल पटेलला स्थान दिले नाही, तर शमीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे भुवनेश्वर, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या असा वेगवान मारा निश्चित करण्यात आला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात या चौकडीने उत्तम कामगिरी केली. पण हे सातत्य नंतर टिकले नाही. आवेश आजारी पडल्याने काही सामन्यांना मुकला आणि नंतर संघाबाहेर गेला.

१९व्या षटकात भुवनेश्वरच्या गोलंदाजीमुळे सामने हातातून निसटले…

पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या ‘अव्वल चार’ फेरीमधील सामने भारताने भुवनेश्वरच्या १९व्या षटकात गमावले. पाकिस्तानविरुद्ध दोन षटके बाकी असताना भारताला २६ धावा हव्या होत्या. त्यावेळी भुवनेश्वरने १९ धावा दिल्यामुळे अखेरच्या षटकात पाकिस्तानला सात धावा काढणे जड गेले नाही. मग श्रीलंकेविरुद्ध भारताला दोन षटकांत २१ धावांची आवश्यकता होती. पण भुवनेश्वरने १४ धावा दिल्यामुळे सामना श्रीलंकेच्या आवाक्यात आला. उर्वरित सात धावा अखेरच्या षटकात काढून श्रीलंकेने हा सामना जिंकला होता. ‘‘भुवी हा चांगला गोलंदाज आहे. पण त्याच्याकडे ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी लागणाऱ्या वेगाचा अभाव आहे. भुवनेश्वरचा वेग १३५ किमी प्रति ताशी इतका आहे. पण ट्वेन्टी-२०साठी तो १४० किमी प्रति ताशी असायला हवा,’’ अशी तोफ पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने डागली आहे.

विश्लेषण: बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनने सिनक्वेफिल्ड स्पर्धेतून तडकाफडकी माघार का घेतली?

सहाव्या गोलंदाजाची उणीव…

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने सहा गोलंदाजांचा वापर केला. पण त्यानंतर भुवनेश्वर, अर्शदीप, हार्दिक हे तीन वेगवान गोलंदाज आणि रवी बिश्नोई, रविचंद्रन अश्विन आणि यजुर्वेंद्र चहल यापैकी दोन फिरकी गोलंदाज ही गोलंदाजीची फळी होती. त्यामुळे सहाव्या गोलंदाजाची उणीव तीव्रतेने भासली. दीपक हुडाचा कामचलाऊ गोलंदाज म्हणून वापर करण्याचे प्रकर्षाने टाळले. ‘‘या स्पर्धेपूर्वी आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरत होतो. त्यातही दुसरा फिरकीपटू हा अष्टपैलू होता. मात्र, मला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. आम्ही जर तीन वेगवान गोलंदाज, दोन प्रमुख फिरकीपटू आणि एका फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले, तर आम्ही यशस्वी ठरू शकतो का, हे मला पाहायचे होते,’’ असे उत्तर रोहितने दिले आहे.

डावखुरा नसल्यामुळे दिनेश कार्तिक संघाबाहेर…

रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे भारताच्या संघात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. डावखुरा फलंदाज, फिरकी गोलंदाज, अचूक यष्टीफेक करू शकणारा क्षेत्ररक्षक आणि विजयवीर (फिनिशर) अशा अनेक भूमिका जडेजा चोख बजावायचा. पाकिस्तानविरुद्ध डावे-उजवे फलंदाज मैदानावर ठेवून क्षेत्ररक्षण हलते ठेवण्यासाठी जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला बढती देण्याची चाल यशस्वी ठरली होती. जडेजाच्या अनुपस्थितीमुळे वाढीव फिरकी गोलंदाज घ्यावा लागलाच, तसेच डावखुरा फलंदाज हवा म्हणून यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक संघाबाहेर गेला. हेच बलस्थान असलेल्या ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले. पण गेल्या काही महिन्यांत सलामीपासून सातव्या क्रमांकांपर्यंत सर्व स्थानांवर आजमावलेल्या पंतकडून अपेक्षांची पूर्तता होत नाही. त्याच्या यष्टीरक्षणातील धिमेपणाचीही समाजमाध्यमांवर चर्चा केली जात आहे. यापेक्षा ट्वेन्टी-२० प्रकारात विजयवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करणारा कार्तिक अधिक उपयुक्त ठरला असता. जडेजाकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या डावखुऱ्या अक्षर पटेलला संधी देण्याचे भारताने प्रकर्षाने टाळले.

ढिसाळ क्षेत्ररक्षण…

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आसिफ अलीचा झेल अर्शदीपने साेडला. त्यानंतर आसिफने सामन्याचे चित्र पालटले. ढिसाळ क्षेत्ररक्षण हे आणखी एक कारण भारताच्या खराब कामगिरीस जबाबदार मानले जात आहे. जडेजा नसल्यामुळे क्षेत्ररक्षणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

आता तरी रंगीत तालीम घ्यावी…

ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर असंख्य प्रयोग करणाऱ्या भारताने या दोन मालिकांमध्ये तरी रंगीत तालीम म्हणून अपेक्षित संच आजमावण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained how asia cup raises question about indian cricket team print exp sgy
First published on: 09-09-2022 at 07:59 IST