भारतीय मिठाई म्हणजे केवळ चव नव्हे, तर एक सांस्कृतिक अनुभव असतो. अशीच एक अनेक पिढ्यांचा वारसा सांगणारी ‘म्हैसूर पाक’ ही मिठाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका शब्दामुळे देशभक्ती आणि भावना यांच्या झंझावातात सापडलेल्या या पारंपरिक मिठाईची गोष्ट नेमकी काय आहे? याचा घेतलेला हा आढावा.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असताना एक गोड पदार्थ या संघर्षाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जयपूरमधील काही दुकानदारांनी ‘म्हैसूर पाक’ या मिठाईचे नाव बदलून ‘म्हैसूर श्री’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सध्याची जनभावना लक्षात घेऊन हे नाव बदलण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच हैदराबादमधील कराची बेकरीची काही लोकांनी तोडफोड केली होती आणि दुकानासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या होत्या. अर्थात, ‘म्हैसूर पाक’ या लोकप्रिय भारतीय मिठाईच्या नावातील ‘पाक’ या शब्दाचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. हा शब्द नेमका काय अर्थ सांगतो आणि या मिठाईची कथा काय आहे, हे या पार्श्वभूमीवर जाणून घेणं रंजक ठरणार आहे.

‘म्हैसूर पाक’ म्हणजे काय?

ही मिठाई ‘म्हैसूर पाक’ म्हणून ओळखली जाते, त्यामागील कारण आपल्याला २० व्या शतकात सापडते. ही मिठाई २० व्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकातील म्हैसूर (आताचे मैसूरू) येथे तयार झाली होती. पाक हा शब्द कन्नड भाषेतील पाक किंवा पाका या शब्दापासून तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ अन्न शिजवणे असा होतो. अन्न गरम करणे, भाजून किंवा तळून तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी पाक (पाककृती) हा शब्द वापरण्यात येतो. कन्नडमध्ये पाक म्हणजे साखर आणि पाण्याचे समप्रमाणात उकळून तयार होणारा चिकट पाक देखील होतो.

म्हैसूर पाकची उत्पत्ती कशी झाली?

या मिठाईचा जन्म म्हैसूरच्या वोडेयर घराण्याच्या राजवटीत झाला. कृष्णराज वोडेयर यांनी १९०२ ते १९४० या कालखंडात राज्य केले. त्यांचा कालखंड हा सुधारणांचा कालखंड मानला जातो. त्यांच्याच कालखंडात बंगळूर हे वीज मिळवणारे पहिले आशियाई राज्य ठरले होते. ते केवळ त्यांच्या दूरदृष्टीसाठी नाहीत तर खाद्य प्रेमासाठीही प्रसिद्ध होते. त्यांच्या पॅलेसचे नाव अम्बा विलास होते. या प्रसादात एक भव्य स्वयंपाक घर होते. शिवाय काकासूरा मडप्पा नावाचा शाही स्वयंपाकीही होता.

मडप्पा यांनी एकदा बेसन, तूप आणि साखर वापरून प्रयोग केला आणि त्यातूनच म्हैसूर पाक तयार झाला. कृष्णराज वोडेयर यांनी ती मिठाई चाखली आणि त्यांना ती फारच आवडली. त्यांनी मडप्पाला या मिठाईचं नाव विचारलं, परंतु मडप्पा याला प्रयोगातून तयार झालेल्या या मिठाईचे नाव सांगता आले नाही. तेव्हा राजाने स्वतःच त्या मिठाईला ‘म्हैसूर पाक’ असे नाव दिले. या मिठाईला शहराचे नाव देण्यामागे त्यांनी विकास केलेल्या शहराच्या नावाचा उल्लेख इतिहासात कायम राहावा हा मुख्य हेतू होता.

त्यानंतरच्या वर्षांमध्ये ही मिठाई लोकप्रिय झाली आणि प्रत्येक घरात तयार केली जाऊ लागली. आजही म्हैसूर पाक खास प्रसंगी, विशेषतः दक्षिण भारतात, मोठ्या प्रमाणावर तयार केली जात. महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे मडप्पा यांचे कुटुंब आजही म्हैसूर मध्ये मिठाईचे दुकान चालवते. हे दुकान कधीकाळी मडप्पा यांच्या मालकीचे होते. या मिठाईच्या नावावरून निर्माण झालेल्या वादाबद्दल बोलताना मडप्पांचे पणतू नटराज यांनी सांगितले की, म्हैसूर पाकला त्याच्या योग्य नावानेच ओळखले गेले पाहिजे. केवळ कोणत्यातरी दुसऱ्या भाषेच्या अनुकूलतेसाठी या मिठाईचे नाव बदलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हैसूर पाक कसा तयार करतात?

म्हैसूर पाक तयार करण्यासाठी तूप, बेसन आणि साखरेचा वापर केला जातो. सर्वप्रथम तूप मध्यम आचेवर गरम केले जाते. एकदा का तुपाचा गंध पसरला की, त्यात त्यात बेसन घालून काही मिनिटे सतत परतले जाते. मिश्रणाला जोपर्यन्त एक गडद तपकिरी छटा येत नाही, तोपर्यन्त बेसन तुपावर खरपूस भाजण्यात येते. तर दुसरीकडे वेगळ्या भांड्यात साखरेचा पाक तयार केला जातो. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत साखर गरम केली जाते, एकदा का साखरेचं पाणी घट्टसर, चिकट झालं की त्यात भाजलेलं मिश्रण टाकलं जात. ते सर्व घटक एकजीव होऊपर्यन्त घाटले जातात. त्यानंतर हे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात ओतले जाते आणि थंड केले जाते. एकदा का ते गार झाले की त्याच्या वड्या पाडल्या जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कधी काळी केवळ तूप, बेसन आणि साखरेच्या रसायनातून जन्मलेली ही मिठाई आज सांस्कृतिक अस्मितेचा ठरत आहे. परंतु, एखाद्या पारंपरिक पदार्थाला नावाच्या अर्थाऐवजी त्याच्या चवीमुळे, इतिहासामुळे आणि भावनिक नात्यामुळे ओळख मिळाली आहे. ‘म्हैसूर पाक’ ही फक्त मिठाई नाही, तर एका शाही स्वयंपाकीच्या प्रयोगशीलतेची आणि एका दूरदृष्टी असलेल्या राजाची स्मृती जपणारी, भारतीय मिठाईच्या वारशाची गोड चव आहे.