लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी हाफिज सईद याला भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी तशी माहिती दिली. याच पार्श्वभूमीवर हाफिज सईदची प्रत्यार्पणाची मागणी का करण्यात आली? तो मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या रांगेत कसा जाऊन बसला? अमेरिकेचे या दहशतवाद्यासंदर्भात काय विचार आहेत? हे जाणून घेऊ या..

दहशतवादी प्रशिक्षणासाठी गाठले अफगाणिस्तान

गेल्या काही वर्षांत भारताने पाकिस्तानकडे हाफिज सईद याच्या प्रत्यार्पणाची मागणी अनेकवेळा केलेली आहे. मात्र पाकिस्तानने प्रत्येकवेळी त्याला भारताला सोपवण्यास मनाई केलेली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हाफिज सईद १९७० किंवा १९८० च्या काळात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये गेला होता. तेथे त्याची अब्दुल्ला आझम याच्याशी भेट झाली. आझमने ओसामा बिन लादेनसह अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

१९९० साली लष्कर ए तैयबाची स्थापना

हाफिज सईदने १९९० साली लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. लष्कर ए तैयबा या संघटनेबाबत अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये सविस्तर नोंद आहे. “लष्कर ए तैयबा या संघटनेने भारतीय लष्कर आणि तेथील नागरिकांना अनेकवळा लक्ष्य केलेले आहे. १९९३ सालापूसन या कारवाया सुरू आहेत,” असे अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये नमूद आहे. भारतीय संसदेवर २००१ साली दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे हाफिज सईद असल्याचा दावा भारताने केला होता. मात्र तेव्हापासून सईदकडून मी या संघटनेचा म्होरक्या नाही, असे सांगितले जाते. २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तैयबा आणि हाफिज सईद असल्याचे भारताकडून म्हटले जाते. या हल्ल्यात एकूण १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यात ६ अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता.

अमेरिकेची भूमिका काय?

याच लष्कर ए तैयबा संघटनेबाबत अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आलेली आहे. “२००६ साली मुंबईत रेल्वेगाड्यांवर हल्ला करण्यात आला होता. २००१ सालच्या डिसेंबर महिन्यात भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यांमागे लष्कर ए तैयबा असल्याचे भारताकडून सांगितले जाते,” असे या संकेतस्थळावर नमूद आहे.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी आर्थिक मदत

“लष्कर ए तैयबाच्या प्रशिक्षित दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी नेमके कोठे पाठवायचे याबाबत सईदने २००५ साली निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत त्याने लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांना इराकमध्ये पाठवता यावे यासाठी स्वत: सौदी अरेबियाचा दौरा केला. २००६ साली सईदने दहशतवाद्यांची शिबिरे आयोजित करण्यास मदत केली. त्यासाठी त्याने आर्थिक मदतदेखील केली,” असेही
अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटच्या संकेतस्थळावर नमूद आहे.

मुंबईव दहशतवादी हल्ल्यातील आरोपी

सईदवर आतापर्यंत अनेकवेळा अटकेची कारवाई झालेली आहे. मात्र जेव्हा-जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा-तेव्हा त्याची सुटका करण्यात आली. २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात माझा हात नसल्याचा दावा सईदकडून केला जातो. तसेच माझा लष्कर ए तैयबा आणि जमात उल दावा (जेयूडी) अशा कोणशीही संबंध नाही, असा दावा सय्यदकडून केला जातो.

२०१९ सालापासून सईद तुरुंगात

हाफिज सईदवर जुलै २०१९ मध्ये अटकेची कारवाई करण्यात आली होती. लाहोरहून हुरजनवाला येथे जात असताना त्याला पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप होता. एप्रिल २०२२ मध्ये त्याला दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ३२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने २०१२ सालापासून १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस जाहीर केलेले आहे. २०१९ सालापासून हाफिज सईद हा तुरुंगात आहे.

हाफिज सईदने केली पक्षाची स्थापना

दरम्यान, हाफिज सईदने नव्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. या पक्षाचे नाव पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीग (PMML)असे आहे. पाकिस्तानमध्ये येत्या ८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी निवडणूक होणार आहे. या निडणुकीत हाफिज सईदचा पक्ष आपले उमदेवार उभे करणार आहे. या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘खुर्ची’ हे आहे.