वाहन निर्मिती उद्योगात भारताचे जगात तिसरे स्थान आहे. परंतु एक गहिरे संकट या उद्योगावर येऊ घातले आहे. तेही चीनच्या एप्रिलमधील एका अकस्मात निर्णयामुळे. चीनने त्यांच्याकडील दुर्मिळ संयुगांच्या (रेअर अर्थ) निर्यातीवर बंधने घातली आहेत. यामुळे भारतातील वाहन कंपन्या हवालदिल झाल्या असून, त्यांनी याबाबत भारत सरकारबरोबर चीन सरकारचीही मनधरणी सुरू केली आहे.
दुर्मिळ संयुगांच्या निर्यातीवर निर्बंध का?
कारमधील ऑडिओ, (संगीत यंत्रणा) पॉवर विंडो आणि इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी (ईव्ही) अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दुर्मिळ संयुगांच्या (रेअर अर्थ मॅग्नेट) निर्यातीवर चीनने निर्बंध आणले आहेत. यामुळे भारतीय वाहनिर्मिती उद्योगाची व्यवस्था साखळी खंडित होण्याची भीती आहे. अर्थात या उद्योगातील माहितगार आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मते, दुर्मिळ संयुगांचा पुरवठा स्थिर न झाल्यास जूनमध्येच उत्पादन थांबवावे लागेल.
निर्यात केल्या जाणाऱ्या ३० हून अधिक दुर्मिळ संयुगांच्या निर्यात मालाची जागतिक व्यापार महासंचालयाने खातरजमा केली. त्यासाठीचे प्रमाणपत्रही महासंचालनालयाने जारी केले. त्यात दुर्मिळ संयुगे ही लष्करी कारणांसाठी वापरली जाणार नाहीत वा त्यांची फेरनिर्यात होणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र, या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भारताचे अशा अत्यंत निकडीच्या तंत्रज्ञान अंगभूत सुट्या भागांसाठी एकमेव भू-राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रावरील अवलंबित्व उघड होणार नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
भारतीय कार उत्पादक कंपन्यांची अडचण काय?
अत्यंत प्रगत तंत्रज्ञान प्रणाली वा संरक्षण सिद्धता यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या दुर्मिळ संयुगांच्या निर्यातीसाठी मंजुरी सशर्त करण्याच्या चीनच्या नव्या धोरणामुळे पुरवठा खंडित होण्याची भीती आहे. भारताने या नव्या धोरणानुसार मंजुरीपत्र मिळवून आयातीचा निर्णय घेतला तरी पुरवठ्याची श्रृंखला बाधित होण्यास सुरुवात झाली आहे. परवान्यांसाठी निश्चित नियम काय असावेत, यावर प्रशासनच बुचकळ्यात पडल्याने ही आपत्ती अधिक आव्हानात्मक असेल.
सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्याकडील कागदपत्रांच्या आधारे भारतातील प्रमुख कंपन्यांना जूनपर्यंत उत्पादन थांबवावे लागेल. यासंदर्भात वाणिज्य मंत्रालयाशी झालेल्या एका तातडीच्या बैठकीत मारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. पुरवठा साखळीतील एक जरी दुर्मिळ संयुग भारतात न आल्यास कार उत्पादित करता येऊ शकणार नाही.
भारताची भविष्यातील गरज किती?
सुरुवातीची अटकळ अशी आहे की, मे महिन्याच्या अखेरीस दुर्मिळ संयुगाचा साठा संपुष्टात येऊ शकतो. २०२४मध्ये भारताने ४६० टन इतके दुर्मिळ संयुग आयात केले होते. यावर्षी त्यात वाढ होऊन दुर्मिळ संयुगाची आयात ७०० टनांवर जाण्याची शक्यता आहे. यासाठी भारताला ३० दशलक्ष डॉलर मोजावे लागतील. परंतु जोवर चीन परवाना प्रक्रियेत अडथळे आणत राहील, तोवर भारताचे साध्य चकवा देऊ शकते.
चीनच्या हमीनंतरही अडचण कोणती?
दुर्मिळ संयुगांवरील प्रक्रियेतील ९० टक्के इतकी क्षमता सध्या चीनच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले नवे व्यापारी धोरण आणि टॅरिफ (आयात दर) युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तरादाखल चीनने हे निर्बंध लागू केले आहेत. यात भारतीय कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले नसले तरी या दोन्ही राष्ट्रांच्या दरयुद्धात त्या भरडल्या जाण्याची शक्यता आहे. चीनच्या नवी दिल्लीतील वकिलातीने नियामक बाबींनुसार दुर्मिळ संयुगाच्या पुरवठ्याची हमी सरकारला दिली असली तरी त्याला लालफितीचा फटका बसू लागला आहे. आयातदारांना भारतीय मंत्रालयाकडूनच मंजुरी पत्र नाही तर चीन वकिलातीकडूनही मान्यता गमावून बसण्याची पाळी येऊ शकते. कारण मंत्रालयाने दिलेली कागदपत्रांची पडताळणी करून चीन वकिलातीतील अधिकारी तो संच पुढे निर्यातीसाठी पाठवित असतात. यातील कोणतीही दिरंगाई आयातदारांना नुकसानीची ठरू शकते. फोक्सवागेन वा अन्य जागतिक ब्रँडसाठी आवश्यक निर्यात होत असून चीन आणि भारत यांच्यात ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे भारतीय कंपन्यांनी दुर्मिळ संयुगाचा पुरवठा तातडीने होऊ शकलेला नाही.
दुर्मिळ संयुगे भारतात आहेत का?
चीनच्या या भूमिकेचा मुकाबला करण्यासाठी एकतर त्यांच्याशी सकारात्मक बोलणी करावी लागतील वा व्यावसायिक पातळीवर भारताला जाणवत असलेली कमतरता दूर करण्यासाठी दुर्मिळ संयुगांच्या देशांतर्गत उत्पादनावर भर द्यावा लागेल. ऑटोमोटिव्ह कॉम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएन आणि सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चरर्स यांनी मिळून दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की यातील पुरवठा साखळी ऋण दिशेने सरकल्यास भारतीय कार उत्पादक कंपन्यांसमोरील आपत्ती मोठी असेल. त्यासाठी भारताला उपाययोजना कराव्या लागतील. दुर्मिळ संयुग उत्पादनातील भारताचे अवलंबित्व करण्यासाठी नव्या धोरणाची गरज आहे. अन्यथा परक्यांच्या सहानुभूतीवर भारतीय कार उत्पादन व्यवसाय चालणे कठीण होऊन बसेल.