भक्ती बिसुरे

प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांच्या आहारातील समावेशाच्या प्रमाणात १९९० ते २०१८ या काळात जगभरामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उत्पादन क्षमतेतील वाढ, उंचावलेल्या आर्थिक स्तरामुळे आवाक्यात आलेल्या किमती आणि तरतऱ्हेची ‘डाएट्स’ यांमुळे प्राणीज पदार्थांच्या आहारातील समावेशाकडे ओढा वाढत असल्याचे निरीक्षण आहे. याचे परिणाम आणि दुष्परिणामांचा आढावा लॅन्सेट या प्रसिद्ध आरोग्यपत्रिकेने घेतला आहे.

लॅन्सेटचा शोधनिबंध काय सांगतो?

१९९०-२०१८ या काळात जगभरातील नागरिकांच्या आहारात दूध, चीज, अंडी, प्रक्रिया केलेले मांस आणि मासे यांचा समावेश वाढला आहे. भारतीय आणि आशियाई नागरिकही याला अपवाद नाहीत, मात्र भारतीयांची पसंती अंडी, दूध, मांस आणि मासे या पदार्थांना आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकाने नुकतेच जागतिक स्तरावरील बदललेल्या आहार सवयींचा आढावा घेणारे हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. १९९०-२०१८ या काळातील जागतिक, सामाजिक आणि स्थानिक आहार सवयींतील प्राणीज उत्पादनांचे प्रमाण या संशोधनातून आहारातील दुधाचे प्रमाण ९६ टक्के, चीजचे प्रमाण ५६ टक्के तर अंड्यांचे प्रमाण सुमारे १४१ टक्क्यांनी वाढल्याचे लॅन्सेटने स्पष्ट केले आहे. भारतीयांकडून मात्र दूध, प्रक्रिया केलेले मांस आणि माशांना आहारात पसंती देण्यात येते. आहाराच्या या बदललेल्या सवयींचा काळाबरोबर वाढत चाललेले आर्थिक स्थैर्य, पदार्थांची सहज उपलब्धता, प्राणी पालनाच्या व्यवसायाकडे वाढता कल आणि प्रक्रिया उद्योगांचे वाढते जाळे यांच्याशी संबंध आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान या देशांतील सुमारे सहा लाखांहून अधिक नागरिकांच्या आहारविषयक सवयी या संशोधनात नोंदवण्यात आल्या आहेत.

प्राणीज पदार्थांचा वापर का वाढला?

प्राणीज पदार्थ आणि त्यांवर प्रक्रिया करून तयार होणारे अन्नपदार्थ मानवाच्या आहारात पूर्वापार समाविष्ट आहेत. दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मांसावर प्रक्रिया करून तयार होणारे पदार्थ आणि मत्स्याहार यांचा वापर मागील काही वर्षांत लक्षणीय वाढला आहे. प्राणीज पदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने गेल्या काही वर्षांत आहारात प्राणीज पदार्थ घेण्याकडे कल वाढतो आहे. पदार्थांची उपलब्धता आणि ते परवडण्यायोग्य आर्थिक सुबत्ता या दोन्ही गोष्टी नसताना आहारात या पदार्थांचा वापर मर्यादित होता. मात्र, आता चित्र बदलले आहे. पदार्थांची उपलब्धता वाढली आहे तसेच त्यांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. काळाबरोबर विविध प्रकारचे डाएट्स, जिम आणि व्यायामांचे प्रकार या गोष्टीही मानवाच्या आधुनिक जीवनशैलीचा भाग आहे. व्यायाम आणि डाएट याला अनुसरून बदलण्यात येणाऱ्या आहाराच्या सवयींमुळेही आहारात प्राणीज पदार्थांचा अतिरेक वाढत आहे.

वाढ योग्य की अतिरेकी?

मागील काही वर्षांत प्राणीज पदार्थांचे आहारातील प्रमाण केवळ वाढलेले नाही, तर काही वेळा ही वाढ अतिरेकी असल्याचे निरीक्षण आहारतज्ज्ञ नोंदवतात. जिम किंवा डाएटची गरज म्हणून मांसाहाराची सवय नसताना अचानक केवळ मांसाहारावर येणे, डाएटच्या नियमांना बळी पडून आहारातील इतर पोषण मूल्यांचा समावेश वगळणे यांमुळे निर्माण होणारा असमतोल शरीरासाठी घातक ठरत आहे. किमती सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात आल्याने पूर्वी आठवड्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळी होणारे मांसाहाराचे सेवन, आता दैनंदिन झाले आहे. जीवनसत्त्वांची कमतरता, ब-१२ प्रकारातील जीवनसत्त्वे केवळ मांसाहारातून मिळतात असे समज अशा अनेक कारणांनी विशेषत: प्रक्रिया केलेले मांस आणि मत्स्याहाराचा समावेश अनियंत्रित वाढला आहे. अनियंत्रितपणे घेतला जाणारा कोणताही आहार शरीरासाठी हानिकारक असतो, त्यामुळे प्राणीज पदार्थांच्या अतिरेकाचे परिणाम आरोग्यावर दिसत असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.

दुष्परिणाम किती गंभीर?

डाएट हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. डाएटच्या अनेक पद्धती अधूनमधून चर्चेत येतात. त्या सगळ्या पद्धती स्वत:वर आजमावून बघण्याच्या मानसिकतेत वाढ झाली आहे. त्यातून एकच एक गोष्ट अतिरिक्त खाल्ली जाते. प्राणीज पदार्थांच्या सेवनाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आहारात प्राणीज पदार्थांच्या अतिरेकामुळे प्रकृतीच्या अनेक तक्रारी सध्या डोके वर काढताना दिसतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा या प्रमाणात मांसाहाराचे सेवन केले जात असे. आता डाएटच्या नावाखाली रोज मांसाहार केला जातो. चीज, पनीर यांचे आहारातील प्रमाणही लक्षणीय आहे. अतिरिक्त प्रथिनांमुळेही कॅल्शियमचा ऱ्हास होतो. मूत्रपिंडे आणि हृदयाचे विकार सुरू होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकाराच्या आहाराचा अतिरेक योग्य नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे.

यावर उपाय काय?

आहाराच्या सवयींबाबत प्रयोग करत राहण्यापेक्षा वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबात घेतला जाणारा आहार घेणे हे सर्वात उपयुक्त असल्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आहाराच्या पद्धतींमध्ये सातत्याने प्रयोग न करणे, शक्यतो डाएटच्या नवनव्या तऱ्हा अवलंबण्याचा अट्टाहास न करणे तसेच आजार किंवा पोषणमूल्यांची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहाराच्या सवयी बदलणे योग्य आहे, असे आहारतज्ज्ञ अधोरेखित करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

bhakti.bisure@expressindia.com