जगाची लोकसंख्या १५ नोव्हेंबरला ८०० कोटी झाली. या ऐतिहासिक लोकसंख्येच्या आकड्यासोबत भारतासाठी काही संधी निर्माण झाल्या आहेत, तर काही अडचणीही निर्माण होणार आहेत. पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकत लोकसंख्येच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल.

मानवी इतिहासात ८०० कोटी लोकसंख्या हा ऐतिहासिक टप्पा आहे. मात्र, याचवेळी संयुक्त राष्ट्राने एक इशाराही दिला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) म्हटलं, “लोकसंख्येतील ही वाढ गरिबीतील घट, लिंग विषमता, आरोग्य सुविधेतील प्रगती आणि शिक्षणाची उपलब्धता याची साक्षीदार आहे. यामुळे मुलींच्या जन्मदरातही वाढ झाली आहे. तसेच दशकांमागून दशके बालमृत्यूदर कमी होत आहे आणि आयुर्मानातही वाढ होत आहे.”

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, २०२० मध्ये १९५० पासूनची सर्वात कमी लोकसंख्या वाढीची नोंद झाली आहे. त्यावर्षी १ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या वाढली. जागतिक लोकसंख्या वाढीचा दरही सर्वात कमी आहे. २०३० पर्यंत ही लोकसंख्या ८५० कोटी इतकी होईल. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९७० कोटी होईल. २०८० मध्ये जगाची लोकसंख्या सर्वोच्च पातळीवर असेल आणि तेव्हा हा आकडा १०४० कोटी होईल. २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या १०४० कोटीवर स्थिर राहील.

२०५० मध्ये जगातील एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या ही केवळ आठ देशांची असेल. यात भारतासह काँगो, इजिप्त, इथिओपिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश असेल.

भारताचं स्थान काय?

यंदा भारतातील लोकसंख्येचं सरासरी वय २८.७ वर्षे होतं. चीनमधील लोकसंख्येचं सरासरी वय ३८.४ वर्षे आहे आणि जपानचं ४८.६ वर्षे इतकं आहे. जगभरातील लोकसंख्येचं सरासरी वय ३०.३ वर्षे आहे. याशिवाय २०२३ मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनलाही मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनेल.

अहवालानुसार, २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या १४१.२ कोटी लोकसंख्या असेल, तर चीनची लोकसंख्या १४२.६ कोटी असेल. या शतकाच्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या १६६.८ कोटी इतकी होईल, तर चीनची लोकसंख्या १३१.७ कोटी असेल, असा अंदाज आहे. २०२२ मध्ये भारताची ६८ टक्के लोकसंख्या १५ ते ६४ वयोमानातील असेल, तर ७ टक्के लोकसंख्या ६५ वर्षांपुढील असेल.

हेही वाचा : विश्लेषण : यंदा ५० टक्के लोक स्वतःच आपली माहिती भरू शकणार, काय आहे अमित शाहांनी घोषणा केलेली ई-जनगणना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय भारताची २७ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या १५ ते २९ वयोगटातील असेल.इतकंच नाही तर भारतात १०-१९ या किशोरवयीन अवस्थेतील मुलांची संख्या जगात सर्वाधिक असेल. कधी नव्हे भारतात किशोरवयीन आणि तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. २०३० पर्यंत भारतात सर्वाधिक तरूण लोकसंख्या असेल.