Attock to Cuttack Maratha Empire: पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर #OprationSindoor च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ नेस्तनाबूत करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने गाळलेले नक्राश्रू संपूर्ण जगाने पाहिले. या ९ दहशतवादी तळांमध्ये बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चक अमरु, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबादचा समावेश होता. ही सर्व दहशतवादी ठिकाणं पाकिस्तानमध्ये (काही POK मध्ये) भारताच्या सीमेनजीक आहेत. भारताने थेट पाकिस्तानमध्ये हवाई हल्ल्याच्या माध्यमातून केलेला हा आघात इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेचे स्मरण करून देणारा आहे. त्याच ऐतिहासिक घटनेचा घेतलेला हा आढावा.

ती ऐतिहासिक घटना कोणती?

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ साली हिंदवी स्वराज्याचा पाया रचत परकीय शक्तींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पुढील तीन शतकं मराठा साम्राज्याने संपूर्ण भारतात आपल्या पराक्रमाची पताका फडकावली. परंतु, या अभिमान वाटाव्या अशा इतिहासाला गालबोट लागले ते १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभवामुळे. परंतु, त्यापूर्वी प्रत्येक मराठी माणसाला पर्यायाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना १७५७ साली घडली. भारताने पाकिस्तानवर केलेल्या अलीकडचा हल्ल्यातील सर्व ठिकाणं अटक या ठिकाणापासून २०० ते ७०० किमी अंतरावर आहेत. १७५७ साली २६७ वर्षांपूर्वी मराठ्यांनी सिंधू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या याच अटकच्या किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकावला होता. आता पुन्हा तोच क्षण अनुभवास मिळत आहे.

अटक का होते महत्त्वाचे?

अटक (Attock) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक ऐतिहासिक शहर आहे. इस्लामाबादच्या उत्तरेस सुमारे ८० किमी अंतरावर सिंधू नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. खैबर दर्रा आणि मध्य आशियातून येणाऱ्या मार्गावर असल्याने हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या एक महत्त्वाचे लष्करी आणि व्यापारी केंद्र होते. अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून भारतात येणाऱ्या सैनिकांना थोपवण्यासाठी या शहरात १५८१ साली अकबराने किल्ला बांधला. पुढे याच किल्ल्यावर मराठ्यांनी भगवा फडकावला होता. अटक हे शहर ऐतिहासिक गांधार प्रदेशात वसलेले आहे. भारतावर आक्रमण करताना अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर), महमूद गझनी, तैमूर, नादिरशहा आणि बाबर यांनी सिंधू नदी ओलांडण्यासाठी अटक किल्ल्याजवळचा मार्ग वापरला होता. नादिरशहानं कर्नालच्या लढाईत मुघलांना पराभूत केलं, तेव्हा त्याने अटकमार्गे भारतात पुढे शिरकाव केला होता. या विजयामुळे उत्तर भारतातील मुघल साम्राज्याला फटका बसला होता. एकूणच अटक हे त्याकाळीही रानटी टोळ्यांना लपण्यासाठी आणि पुढे उत्तर भारतात शिरण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण होते. आजही त्याच भौगिलिक परिस्थितीचा वापर पाकिस्तानी दहशतवादी करतात.

अटक (विकिपीडिया)

अटक खुर्द ते कॅम्पबेलपूर

या शहराचे मूळ नाव अटक खुर्द होते. इंग्रजांनी हा किल्ला १८४९ साली ताब्यात घेतला होता. ब्रिटिश राजवटीत या शहराचे नाव ‘कॅम्पबेलपूर’ असे ठेवण्यात आले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर या भागाचे सामरिक महत्त्व लक्षात घेत ब्रिटीशांनी १८५७-५८ दरम्यान कॅम्पबेलपूर कँटोनमेंटची (सैनिकी छावणी) स्थापना केली होती. १९७८ साली या शहराचे मूळ नाव ‘अटक’ पुन्हा स्वीकारण्यात आले.

अटक (विकिपीडिया)

अटक से कटक

ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतात फाळणीपूर्वी अटक हे उत्तरेकडील सर्वात शेवटचं शहर मानलं जात होतं. त्यामुळे अटकचं नाव ‘अटक से कटक’ या लोकप्रिय हिंदी-उर्दू वाक्प्रचारात येत असे. हा वाक्प्रचार प्रथम मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आला होता. मराठ्यांनी १७५७ साली कटक तर १७५८ साली अटक जिंकले होते.

बाजीराव पहिला (विकिपीडिया)

मी अटकेवर मराठ्यांचा भगवा फडकवीन

जी. एस. छाब्रा यांनी त्यांच्या ऍडव्हान्स स्टडी इन द हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया (खंड १ : १७०७-१८०३) या पुस्तकात बाजीराव पहिला व छत्रपती शाहू महाराज यांच्यातील संभाषण दिले आहे. बाजीरावाने’ अटकेवर मराठ्यांचा भगवा फडकवीन ‘ असे आश्वासन दिले होते. बाजीराव पहिल्याने आयुष्यात ४१ लढाया जिंकल्या आणि एकही हरला नाही.

रघुनाथराव (विकिपीडिया)

अखेर भगवा फडकला

१९४० साली पहिल्या बाजीरावांचे निधन झाल्यावर पेशवेपद हे नानासाहेबांकडे आले. नानासाहेबांनी दक्षिणेकडील मोहिमांचे नेतृत्त्व केले. याच कालखंडात नानासाहेबांचे भाऊ रघुनाथरावांनी उत्तरेकडे कूच केली होती. १७५७ साली रघुनाथराव आणि तुकोजी होळकर यांनी अफगाण सम्राट अहमदशाह अब्दालीच्या सैन्याचा पराभव केला. यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये अब्दालीने दिल्ली अनेकदा लुटली होती. तर, पुढील दोन वर्षांमध्ये अफगाण व मुघल सरदारांना मराठ्यांकडून हार पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लाहोर आणि पेशावरवर ताबा मिळवला आणि अटकेच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ध्वज फडकवला. या लढाईनंतर मराठ्यांनी दिल्लीवर नियंत्रण मिळवले. अंताजी मांकेश्वर यांना दिल्लीतील मराठा प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले. मुघल सम्राट आलमगीर दुसरा हा गादीवर तर बसला परंतु, त्याच्याकडे सत्ता नाममात्र उरली.

तुकोजी होळकर (विकिपीडिया)

परंतु, अटकेवर मराठ्यांचे वर्चस्व अल्पकालावधीसाठी होते. अहमदशहा अब्दालीने अटक पुनः हस्तगत करण्यासाठी कूच केली. शेवटी १७६१ साली पानिपतच्या लढाईत मराठा सैन्याचा पराभव झाला आणि त्यांच्या उत्तर भारतातील विस्ताराला आळा बसला. १७६० पर्यन्त मराठा साम्रज्याचा विस्तार अटकेपासून कटकपर्यन्त झाला होता. इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात सत्तेचा विस्तार करणारे दुसरे कोणतेही हिंदू किंवा भारतीय राज्यकर्ते नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.