गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी भक्तांची धावपळ उडाली असून बाजारपेठादेखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. गणपती आरस, माटी सामान खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली असून, या सामानाने बाजारपेठ फुलल्या आहेत. गौरी-गणपती सणासाठी चाकरमानी रेल्वे, बस, एस.टी., स्वत:च्या वाहनाने गावात दाखल होत आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा खेळखंडोबा उडाला आहे. या सणावर महागाईचे सावट असले तरी गरीबापासून श्रीमंतापर्यंत गणेश चतुर्थी ऐपतीप्रमाणे आनंदाने साजरी करण्यासाठी धावपळ करत आहे. निसर्ग आणि गणेश यांचे ‘निसर्ग वाचवा’चे संदेश देणारे माठी सामान बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात दाखल झाले आहे. गणेश चतुर्थीसाठी वापरण्यात येणाऱ्या माटी सामानात औषधी गुणधर्म आहेत. या सामानात श्रीफळ, कवंडाळ, काकडी, शेरवाड, तसेच जंगलातील विविधांगी फळे-फुलांचा समावेश आहे. गणेश मूर्ती जेवढी आकर्षक त्याहीपेक्षा सजावट चांगली हवी म्हणून आरास व माटी सामानाकडे भक्तगण अधिक लक्ष देतात असे सांगण्यात आले.