आयपीएलच्या दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार नसणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात महेला जयवर्धने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम्ही शुन्यापासून सुरुवात करणार आहोत. आम्ही मागच्या हंगामाचे विजेते आहोत याची आम्हाला जाणीव आहे, मात्र यंदाच्या हंगामात आम्ही जिंकू याची खात्री देता येणार नाही. अकराव्या हंगामात स्पर्धा कठीण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी आमची रणनिती वेगळी असेल.”

अकराव्या हंगामासाठी यंदा मुंबई इंडियन्सने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. याचसोबत राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब यासारख्या संघांनीही अकराव्या हंगामात नव्याने संघाची मोट बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. अकराव्या हंगामाच्या पहिला सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात वानखेडे मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी आपण विशेष रणनिती आखत असल्याचं जयवर्धनेने स्पष्ट केलं.

मुंबई इंडियन्सने यंदांच्या हंगामात फलंदाजी ऐवजी गोलंदाजांवर भर दिला आहे. पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्लेघनन यासारखे जलदगती गोलंदाज मुंबईच्या खात्यात असणार आहेत. याचसोबत श्रीलंकेचा अकिला धनंजया हा फिरकीपटू यंदा मुंबई इंडियन्सच्या संघात असणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्याची उत्सुकता सर्वत्र शिगेला पोहचलेली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात हे दोन संघ कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.