शारजाच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर थरारक सामन्यात मात केली. पंबाजने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान राजस्थानने ४ गडी राखून पूर्ण केलं. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि राहुल तेवतिया यांनी केलेली फटकेबाजी राजस्थानच्या विजयाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. सामन्यात एका क्षणाला पंजाबचा संघ वरचढ होता. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे पंजाब सामना सहज जिंकेल अचं चित्र निर्माण झालं होतं. परंतू राहुल तेवतियाने शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर ५ षटकार खेचत सामना राजस्थानच्या दिशेने फिरवला.

अवश्य वाचा – IPL 2020 : माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम फिल्डींग ! पूरनच्या कसरतीवर सचिन फिदा

भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने पंजाबच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. शारजाचं मैदान छोटं असून पंजाबच्या एकाही गोलंदाजाने अखेरच्या षटकांत यॉर्कर चेंडूंचा मारा केला नाही. याचसोबत मुरगन आश्विनचाही खुबीने वापर करणं पंजाबला जमलं नसल्याचं सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

पंजाबकडून मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी फटकेबाजी करत संघाला २०० चा टप्पा ओलांडून दिला. मयांकने आयपीएल कारकिर्दीतलं आपलं पहिलं शतक झळकावलं. लोकेश राहुलनेही अर्धशतक झळकावत त्याला चांगली साथ दिली. परंतू अखेरीस पंजाबला पराभवाचा सामना करावा लागलाच.

अवश्य वाचा – IPL 2020 : तेवतियाच्या ५ षटकारांनी फिरला सामना, गेलच्या विक्रमाशी बरोबरी