अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना, विजयासाठी शेवटच्या षटकांत हव्या असलेल्या धावा, फलंदाजांनी फटकेबाजी असा उत्कंठावर्धक माहोल प्रेक्षकांना आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. मात्र अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील सदोष पंचगिरीसंदर्भात दिग्गजांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब संघाचा मार्गदर्शक असणाऱ्या विरेंद्र सेहवाग पाठोपाठ आता पंजाब किंग्स इलेव्हनची मालकीण असणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही पंचांनी केलेल्या एका चुकीचा मला सर्वाधिक त्रास झाल्याचे म्हटलं आहे.

सेहवाग संतापला 

या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवल्यानंतर मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा, असा उपरोधक टोला ट्विटवरुन लगावला आहे. पंजाब धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकात क्रिस जॉर्डनने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असं जाहीर केलं. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते. त्यामुळेच याच रिप्लेच्या स्क्रीनशॉर्टमधील बॅट क्रिजमध्ये टेकवल्याचा फोटो पोस्ट करत सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. “मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,” असं ट्विट सेहवागने केलं आहे.

प्रितीची प्रतिक्रिया

सेहवागने ट्विट केलेल्या याच फोटोला रिट्विट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवताना संघ मालकीण प्रिती झिंटाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “(करोनाची) साथ सुरु असतानाही मी उत्साहामध्ये प्रवास करुन इथपर्यंत आले. सहा दिवस क्वारंटाइन राहिले. करोनाच्या पाच चाचण्यांना अगदी हसत हसत सामोरे गेले. मात्र या एका शॉर्ट रनच्या निर्णयामुळे मी दुखावले गेले. तंत्रज्ञान वापरता येत नसेल तर ते काय कामाचे आहे? हाच योग्य वेळ आहे याबद्दल निर्णय घेण्याचा. बीसीसीआयने नवीन नियम लागू करावेत. दरवर्षी हे असं होता कामा नये,” असं प्रितीने ट्विटरवरुन म्हटलं आहे.

भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्विट केलं आहे. “त्या एका शॉर्ट रनच्या निर्णयाचं काय?”, असं ट्विट करत इरफानने सुमार पंचगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

दोन माजी क्रिकेटपटूंबरोबरच अनेकांनी एवढे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अशा चुका होत असल्याने सामन्याचा निकाल बदलतो यासंदर्भात बीसीसीआयने योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  या शॉर्ट रन प्रकरणामुळे दुसऱ्याच सामन्यामध्ये पंचांच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित राहिल्याचे चित्र दिसत आहे.