बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने ८ गडी राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक झळकावत बंगळुरूला २० षटकात ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि अंबाती रायडू स्वस्तात बाद झाले. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाडने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या आणि चेन्नईला विजय मिळवून दिला.

ऋतुराजची ‘मॅच-विनिंग’ खेळी…

सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेली फिंच-पडीकल जोडी जपून फलंदाजीला सुरूवात केली. पण फिंच १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल २२ धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी बराच खेळ खेळपट्टीवर तळ ठोकला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजी करून दिली नाही. ६८ चेंडूत त्यांना ८२ धावांचीच भागीदारी करता आली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं पण मोठे फटके खेळताना डीव्हिलियर्स ३९ धावांवर तर विराट ५० धावांवर माघारी परतला. मोईन अली आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे बंगळुरूला २० षटकांत केवळ १४५ धावाच करता आल्या.

विराटचं झुंजार अर्धशतक…

या आव्हानाचा पाठलाग करताना मराठमोळा ऋतुराज गायकवाड याने दमदार खेळी केली. आपल्या पहिल्या २ IPL सामन्यात शून्यावर माघारी परतण्याची नामुष्की ओढवलेल्या ऋतुराजने शानदार अर्धशतक ठोकलं. त्याने ४२ चेंडूत ही कामगिरी केली आणि आपली निवड सार्थ ठरवली. फाफ डु प्लेसिस (२५) आणि अंबाती रायडू (३९) दोघांनीही आपापल्या डावाची सुरूवात चांगली केली होती. पण त्यांना मोठ्या खेळी उभारता आल्या नाहीत. ऋतुराजने मात्र धोनीच्या साथीने शेवटपर्यंत मैदानावर तळ ठोकत संघाला विजय मिळवून दिला. धोनीनेही ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १९ धावा केल्या.