शालेय शिक्षण विभागाच्या दक्षिण विभागाच्या वतीने ‘पुस्तकाने मला काय दिले’ या विषयावर शिक्षकांकरिता राज्यव्यापी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनसंस्कृती, वाचनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून ग्रंथमहोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. परळच्या दामोदर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात जवळपास ४०० शाळा सहभागी होतील. या शाळांच्या शिक्षकांबरोबरच विद्यार्थी व पालकही यात सहभागी होणार आहेत.
डॉ. आ. ह. साळुंखे, लक्ष्मण माने, पुष्पा भावे, हरी नरके, रामदास फुटाणे, इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, हेरंब कुलकर्णी, भारत दौंडकर, विश्वास पाटील, निखिल वागळे, महेश केळुसकर, सचिन खेडेकर, मधुकर आरकडे, डॉ. मोनिका ठक्कर आदी मान्यवर यात सहभागी होणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम १० हजार, द्वितीय ५ हजार व तृतीय अडीच हजाराचे पारितोषिक असेल. शब्द मर्यादा १००० ते १२०० शब्द राहील. २० नोव्हेंबपर्यंत निबंध स्वीकारले जातील. संपर्क पत्ता – शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण विभाग, गिल्डर लेन, मनपा माध्यमिक शाळा, तिसरा मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई-८.