अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार..
दहावीप्रमाणेच बारावीसाठीही जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याच्या घोषणा या वर्षी तरी कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. बारावीला असलेल्या विषयांची जास्त संख्या आणि विद्यापीठांची वेगवेगळी वेळापत्रके यामुळे बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वायाच जाणार आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी विषयांची संख्या जास्त असते. द्विलक्ष्यी अभ्यासक्रमही असतो. बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच मोठा विद्यार्थी वर्ग पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असतो.
बारावीनंतरच्या पुढील शिक्षणाचे नियंत्रण हे विद्यापीठाच्या पातळीवरून होत असते. मात्र, राज्यातील विद्यापीठांची वेळापत्रके, सत्रांची वर्गवारी, प्रवेश प्रक्रियेची पद्धत यामध्ये एकसंधता नाही. त्यामुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी विद्यापीठांच्या नियमांमध्येही काही बदल करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थाना कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश द्यावेत याचे निकषही निश्चित होण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती राज्यमंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र, ही प्रक्रिया मोठी असून ती अद्याप सुरूही झालेली नाही. त्यामुळे आता बारावी अनुत्तीर्णासाठी ऑक्टोबर परीक्षेचाच पर्याय पुढील वर्षीही असणार आहे. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्यापासून दिलासा मिळणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. शिक्षण मंत्र्यांनी याबाबत केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे.

वर्षभराचा कृती आराखडा निश्चित
राज्याच्या शिक्षण विभागाने वर्षभरासाठी कृती आराखडा निश्चित केला होता. त्यामध्ये दहावीप्रमाणेच बारावीसाठीही जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांचेही फुकट जाणारे एक वर्ष वाचवण्याची योजना होती. शिक्षणमंत्र्यांनीही त्याबाबत घोषणा केली होती. त्यासाठी या दोन्ही इयत्तांचे निकाल ३१ मेपूर्वी जाहीर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने राज्यमंडळाला दिल्या आहेत. मात्र, पुढील वर्षी म्हणजे २०१६ मध्ये बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याची घोषणा कागदावरच राहण्याची शक्यता आहे. विद्यापीठांची वेगवेगळी वेळापत्रके, प्रवेशाच्या आणि परीक्षांच्या पद्धतींमध्ये असलेले बदल यामुळे बारावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीसाठी तरी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.